धडगाव ; विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपासात हलगर्जीपणा ; पोलीस निरीक्षकांसह उपनिरीक्षक निलंबित

24 Sep 2022 15:04:52

नंदूरबार:
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडक्या येथील विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील यांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा आणि त्यानंतर तिची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी जे. जे. रुग्णालयात पीडितेच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार पुर्नशवविच्छेदन देखील झाले असून या प्रकरणात न्याय वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.
 

dhadgaon 
 
 
 
या प्रकरणात आधी दोन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली होती. मात्र नियंत्रण कक्षातील बदली नव्हे तर यातील दोषींवर निलंबनाच्या कारवाईची चित्रा वाघ आणि सर्वपक्षीय नेत्यांनी मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात ठपका ठेवत तत्कालीन पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे आणि उपपोलीस निरीक्षक बी.के. महाजन यांना निलंबीत करण्यात आले आहे.
 
सविस्तर  प्रकरण?
 
पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, तालुक्यातील वावी येथील रहिवाशी रणजीत ठाकरे आणि अन्य एका जणाने बळजबरीने पीडितेला गाडीवर बसवून 01 ऑगस्ट 2022 ला गावाबाहेर घेऊन गेले होते. यानंतर पीडितेचा तिच्या नातलगाला फोन आला. या फोनवरील संभाषणात तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती सांगितली. पीडितेने फोनवर सांगितले की, रणजीतसह चार जणांनी तिच्यावर चित्रपटाप्रमाणे कुकर्म केले, तसेच ते (आरोपी) मला मारुन टाकतील असे पीडितेने फोनवर सांगितले.
 
या फोननंतर काही काळातच तिने (पीडितेने) वावी येथील एका आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन तिच्या कुटुंबीयांना आला. तिचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्याआधीच वावी गावातील लोकांच्या मदतीने तिचा मृतदेह उतवण्यात आला होता. यावेळी पुरावे नष्ट केले गेले असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांना सांगुनदेखील मृत पावलेल्या पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात याबाबत कुठलीही तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीडितेला फाशी दिली गेली असून पोलिसांच्या मदतीने ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न चालला असल्याचा आरोप तिच्या वडीलांसह कुटुंबियांनी केला आहे.
 
शवविच्छदेनाच्या अहवालानंतर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणातील संशयीत रणजीत ठाकरे याच्यासह तिघांना अटक केली. मात्र, मुलीवर बलात्कार होऊन तिची हत्या झाली असतांना पोलिसांच्या या भूमिकेचा पीडितेच्या वडिलांनी विरोध केला आहे. तिच्या वडिलांनी मुलीचे प्रेत अंतिम संस्कारासाठी ताब्यात मिळाल्यानंतर मृतदेहाला अग्निडाग दिला परंतू त्यावर अंत्यसंस्कार केले नव्हते. त्यांनी आपल्या घराशेजारच्या शेतात खड्डा करुन त्याठिकाणी मिठातच आपल्या मुलींच्या मृतदेहाला पुरले होते. या सगळ्या कठीणप्रसंगी खडक्याचे ग्रामस्थदेखील वळवी कुटुंबियांसमवेत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत.
Powered By Sangraha 9.0