मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. राज्यभर सर्वत्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान विद्यमान ठाकरे सरकारवर बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष अविश्वास प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष अशा ५० आमदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यातच अपात्रतेच्या कारवाईचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असून यावर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टाने दिलेल्या निर्देशांमध्ये अविश्वास प्रस्तावाबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. यामुळे आता अविश्वास प्रस्ताव कुठल्या स्वरूपात दाखल होणार याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष नव्हे तर बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राज्यपालांना पत्र लिहून ठाकरे सरकार यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करणार आहे. त्यांच्या या प्रस्तावाला भाजप, एकनाथ शिंदे यांचा गट आणि अन्य अपक्ष असे मिळून पारीत करून ठाकरे सरकार पाडतील असा अंदाज सध्या वर्तविण्यात असून उद्या वा परवा पर्यंत बच्चू कडू हे राज्यपालांना भेटणार आहेत.