नवी दिल्ली : सध्या देशभर चर्चा होतेय ती केंद्राच्या अग्निपथ योजनेची. या योजनेचे वातावरण चांगलेच तापले आहे. या योजनेचे महत्व लक्षात न घेता बहुतांश ठिकाणी कडाडून विरोध केला जात आहे. तोडफोड आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून यामुळे सरकारी मालमत्तेच प्रचंड नुकसान होत आहे. या योजनेबाबत 14 जून रोजी धोरण जाहीर केल्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, पंजाब, झारखंड आणि आसामसह आणखी काही राज्यांमधून निदर्शने करण्यात आली होती.
मात्र या अग्निपथ योजनेच्या प्रकरणात आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की अग्निपथ योजना ही काळाची गरज आहे. देशाच्या सभोवतालचे वातावरण वेगाने बदलत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लष्करातही बदल करणे गरजेचे असल्याचे मत डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना व्यक्त केले आहे.
अग्निपथ ही एक स्वतंत्र योजना नाही असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदी सत्तेवर आले तेव्हा भारताला सुरक्षित आणि मजबूत बनवणे हे त्यांचे प्रमुख प्राधान्य होते. यापूर्वी जे आपण करत होतो, भविष्यातही तेच करत राहिलो, तर आपण सुरक्षित राहणे अवघड होईल. त्यामुळे भविष्याची तयारी करायची असेल तर, बदलावे लागणारच.