मुंबई : "औरंगाबादचे संभाजीनगर करणे; हा नामांतराचा विषय आमच्या सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही. मुख्यमंत्री औरंगाबादला संभाजीनगर म्हणतात त्यात ते आनंदी आहेत.", असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. मंगळवार, दि. १७ मे रोजी संभाजीनगरच्या दौऱ्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबारात ते पत्रकारांशी बोलत होते.
"औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराचा विषय आमच्या पक्षाच्या आणि सरकारच्या अजेंड्यावरचा विषय नाही. स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना औरंगाबादला संभाजीनगर म्हणते, त्यात ते नक्कीच आनंदी आहेत. गरजेप्रमाणे आणि आपापल्या सोयीप्रमाणे लोकं औरंगाबादला संभाजीनगर म्हणतात. राज्यात पाणी, रस्ते, वीज यांसारखे अनेक प्रश्न आहेत. त्याकडे आपण आधी लक्ष देऊ. त्यामुळे संभाजीनगप हा अजेंड्यावरचा विषय आहे असे काही नाही.", असे राजेश टोपे यांचे म्हणणे आहे.
संभाजीनगरच्या नामांतरावरून भाजप आणि शिवसेनेत वाद सुरू असतानाच महाविकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने असं वक्तव्य करणे म्हणजे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.