मुंबई : महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेकडून संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जून रोजी मतदान होईल.
राज्यसभेसाठी पंधरा राज्यातील 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीने राज्यसभेतील बरीच गणितं बदलणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या 6 खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 जागा आहेत.
राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचंही पुन्हा येणं निश्चित आहे. महाराष्ट्रातील भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत. परंतु, महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. तिसऱ्या जागेसाठी काही मतं कमी पडत आहेत. त्यामुळे या सहाव्या जागेसाठी चुरस निर्माण होऊ शकते.