मुंबई : 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. लातूरच्या उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे.
भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 रोजी जालना येथे झाला आहे. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली.
चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती नाशिक येथील साहित्य संमेलनाच्या समारोपावेळीच देण्यात आली होती. त्यामुळं येत्या तीन महिन्यात संमेलनाची तारीख निश्चित होणार आहे. दरम्यान या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झाल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सासणे यांचं मराठी साहित्यातील योगदान अमूल्य आहे.