दिल्ली:- फक्त चोवीस तासांच्या आतच भारताने गुरुवारी सलग दुसऱ्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'प्रलय'ची यशस्वी चाचणी करून इतिहास रचला. भारताच्या इतिहासात प्रथमच 24 तासांच्या आत दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं 'प्रलय क्षेपणास्त्र' 150 ते 500 किमी अंतरावरील कोणतंही लक्ष्य उध्वस्त करण्यास सक्षम आहे. प्रलय मिसाईलमुळे भारताची लष्करी ताकद प्रचंड वाढली आहे.
प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलयची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्थेने विकसित केलेले घन-इंधन लढाऊ क्षेपणास्त्र भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम 'पृथ्वी डिफेन्स व्हेइकल' अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या प्रलय क्षेपणास्त्राची पेलोड क्षमता 500-1,000 किलोग्रॅम आहे.
प्रलय सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट मोटर आणि इतर नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीत अत्याधुनिक नेव्हिगेशनलआणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत.