विष प्राशनानंतर मित्राला केला व्हीडीओ कॉलींग
जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा तपोवन येथील ३२ वर्षीय शेतकर्याने कर्जबाजारीपणामुळे विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. विनोद जयराम पाटील असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकर्याचे नाव आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की ५ रोजी सकाळी घरच्यांना नाचणखेडा ता. जामनेर येथे जाण्याचे सांगीतले. मात्र तेथे न जाता,स्वतःच्या दुचाकीवरून पहुरहून वाकोदकडे गेला, आणि त्याप्रवासादरम्यानच आधीच विकत घेऊन ठेवलेल्या कोणत्या तरी विषारी पदार्थाचे सेवन केले. विशेष म्हणजे विष प्राशनानंतर लागलीच भ्रमणध्वनीवरून मित्राला व्हिडीओ कॉलींगद्वारा माहितीही दिल्याचे सांगण्यात आले.संबंधीताने त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती कळविताच नातेवाईक घटनास्थळी (वाकोदशिवार) पोहचले. त्यांनी त्याला शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत असल्याचे घोषीत केले.
मृत शेतकरी विवाहीत असून पत्नी रक्षाबंधनासाठी केकतनिंभोरा ता.जामनेर येथे माहेरी आलेली होती. शेतकर्याला मुलगी व मुलगा असून एकुलता-एक असून घरी ३ एकर शेती आहे. देनाबँकसह आदी वित्तीय संस्थाचे सुमारे तीन लाखाचे कर्ज अंगावर असल्याचे सांगण्यात आले. वडील नेहमीच आजारी असतात. त्यात नापीकीमुळे कर्जाचा वाढता डोंगर आदी संकटामुळे युवा शेतकर्याने जीवनयात्रा संपविल्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.के.पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.