आ.चव्हाण यांच्या अधिकारावर गदा आणणार्या महाविकास
आघाडीचा भाजपा, रिपाइ, रासप, शिवसंग्राम महायुतीतर्फे निषेध
चाळीसगाव : शेतकर्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उचलणारे चाळीसगाव तालुक्याचे भाजपा आ. मंगेश चव्हाण यांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून महाविकासआघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असून आ. मंगेश चव्हाण यांनी जनतेच्या समस्या सरकार व मुख्यमंत्री यांच्याकडून सोडविल्या जात नाहीत म्हणून उद्विग्नपणे बोललेल्या रिकामचोट या साध्या सरळ शब्दाचा बाऊ करून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी चाळीसगाव येथे आंदोलन करण्याचा पोरकटपणा केला. शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ हे शिवसेनेत अडगळीत पडलेले असून ते इतके रिकामचोट आहेत की, त्यांना रक्षाबंधनाच्या सणासुदीच्या दिवशी चाळीसगाव येथे येऊन आंदोलन करावे लागले असल्याची टीका भाजपातर्फे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली.
एका राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष एका लोकप्रतिनिधीला भामटा शब्द वापरतो यावरून त्यांची वैचारिक पातळी कळते. एकीकडे राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व इतर राज्यांचे मुख्यमंत्री हे कोरोना निवारणासाठी राज्यभर फिरत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे डब्लुएचओच्या नियमानुसार घरात बसून असल्याचा हास्यास्पद विनोदी दावा त्यांनी केला.
कोरोनासारख्या संकटाच्या काळात महाविकास आघाडीचे नेते घरात बसलेले असताना प्रसंगी आ. चव्हाण यांनी पदरमोड करून नागरिकांची सेवा केली. नवखे असले तरी २४ तास फिल्डवर काम करणारा आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. आ. मंगेश चव्हाण हे चाळीसगाव तालुक्यातील ५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. शेतकरी व जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर महाविकास आघाडी शासन व मुख्यमंत्री लक्ष देत नसल्याने त्यांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे काढून शेतकरी - कष्टकरी यांचे प्रश्न मांडले. कापूसप्रश्नी त्यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन कापूस खरेदी न झालेल्या नोंदणीकृत शेतकर्यांना २ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली.
चाळीसगाव तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यामार्फत मका व हरभरा खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. मात्र त्यावर आजतागायत कारवाई नाही, फक्त दोन गोणी युरीयासाठी शेतकर्यांना दिवसभर पावसात उभे राहावे लागत आहे. आमदार यांनी पाठपुरावा करून व खासदार यांनी मंत्रालयाच्या पायरीवर बसून उपोषणाचा इशारा देऊनही चाळीसगाव नगरपालिकेला मुख्याधिकारी वर्षभरात मिळत नाही. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची रिक्त पदे भरण्यात यावीत व कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी यासाठी मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी पत्र लिहून ते देखील मिळत नाहीत. एकीकडे लॉकडाऊनमुळे लाखो नागरिकांना रोजगार नसताना हजारोंची वाढीव वीजबिले पाठवून नागरिकांच्या जखमेवर मीठ महाविकास आघाडी चोळत आहे ,तर परत परत कडक लॉकडाऊन लावून व्यापारी वर्गाला वेठीला धरलं जात आहे. अस असताना परवा आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप - महायुतीचे दूध उत्पादकांना योग्य दर मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले. अशी सर्व विदारक परिस्थिती असताना पाच लाख लोकांचे प्रतिनिधित्व करणारे आ.चव्हाण उद्विग्न होऊन म्हणाले की, राज्यासमोर इतके सारे प्रश्न आ वासून उभे असताना मुख्यमंत्री यांनी त्यात लक्ष घालून ते प्रश्न सोडविले पाहिजेत, जिल्ह्या - जिल्ह्यात जाऊन नागरिकांना आधार दिला पाहिजे. मात्र मुख्यमंत्री स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भेटत नाही तिथे विरोधात असलेल्या आमदारांनी मांडलेले जनतेचे प्रश्न ते कुठे पाहणार. मात्र याकडे लक्ष व वेळ न देता मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तासनतास प्रवास करतात, स्वतःच्याच वृत्तपत्राला निरर्थक व विनोदी मुलाखती देतात इतके ते रिकामचोट आहेत अशी उद्विग्न होऊन टीका त्यांनी केली त्यात त्यांचे काय चुकले.
मुख्यमंत्री मंत्रालयात पाय ठेवत नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने राज्य चालवायला राज्य हे काय आयटी कंपनी आहे का? रिकामचोट हा असंसदीय किंवा शिवराळ शब्द नाही. खानदेशातील बोलीभाषेत हा शब्द बोलण्याच्या ओघात कायमच सहजगत्या वापरला जातो. त्यात एवढं बाऊ करण्याचे कारण काय? शिवसेनेतील एका स्थानिक कार्यकर्त्यांचे कुठेतरी खाजगी दुखणे आहे त्याकरिता ते सर्व पक्षाला वेठीस धरत आहेत का ? असा सवाल भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, रिपाइ आठवले गटाचे लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, रासपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, रयत क्रांती संघटनेचे पप्पू पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. रिकामचोट या शब्दाचा बाण शिवसेनेला इतकाच जिव्हारी लागला असेल तर त्यांनी भर सभेत कुत्रा घुसल्यावर शिवसेनेचे लोक आलेत का?? अशी शिवसैनिकांना कुत्र्याची उपमा देणारे महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार व शिवसेनेचे लाडके युवराज आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणत राज्यभगर टर उडविणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना माफी मागायला लावावी मग आम्हाला माफीचे बोलावे अशी खोचक टीकाही त्यांनी केली.