वाघूर नदीवर पुल बांधण्याच्या मागणीचे दिले निवेदन
जामनेर : तालुक्यातील भराडी येथील शेतकर्यांसह ग्रामस्थांनी वाघुरनदीवर पुल बांधण्यात यावा यासाठी अखेर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाच लेखी निवेदनाद्वारा शुक्रवारी साकडे घातले.
अनेक वर्षांपासुन भराडी मधील बहुतांश संख्येने असलेल्या शेतकर्यांना आप-आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी हाच एकमेव प्रमुख रस्ता आहे, मात्र पावसाळ्याच्या चार महीने आणि नदीला पाणी असल्यास आणखी दोन ते तीन महीने असे तब्बल सहा-सात महीने या नदीपात्रातून गेलेला कच्चा रस्ता कसाबसा पार करून आपल्या शेतात पोहचावे लागते.
पावसाळ्यात तर जास्तच -फजिती होते,त्यामुळे लहान मोठे अपघातही घडतात. शिवाय पाणी मोठ्या प्रमाणात असले तर महीना-पंधरा दिवस शेताकडे जाणेच बंद ठेवावे लागते.यापूर्वीही अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींसह अधीकार्यांना लेखी-तोंडी मागणी करूनही भराडी-सवतखेड्यास जोडणार्या वाघुर नदीवरील पुलाचे बांधकाम सुरूच होऊ शकलेले नाही असेही शेतकर्यांनी सांगीतले. सध्या शेतीच्या कामांनी गती घेतली असल्याने पुल होणे गरजेचे व आवश्यक असल्याची बाब समोर येत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची त्यांच्या धरणगांवस्थित निवासस्थानी भेंट घेऊन त्यांना पुलाच्या मागणीचे निवेदन सादर केले. याप्रसंगी शेनफडु पाटील, बाळु पाटील, समाधान पाटील, प्रमोद म्हस्के, प्रदीप पाटील, योगेश म्हस्के, वैभव पाटील, विवेक म्हस्के आदी शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.