वैष्णोदेवी यात्रा 16 ऑगस्टपासून

12 Aug 2020 20:57:53
 
 
 
सरकारची नियमावली जाहीर
 
 
उधमपूर : कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर खंडित करण्यात आलेली वैष्णोदेवीची यात्रा 16 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या यात्रेच्या काळात कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली स्थानिक प्रशासनातर्फे जारी करण्यात आली आहे.
 
 
 
Vaishnodevi-Yatra_1 
 
 
 
वैष्णोदेवी यात्रेत दररोज जास्तीत जास्त पाच हजार भाविक सहभागी होऊ शकतात. त्यात दुसर्‍या राज्यातील 500 भाविकांचा समावेश असेल. मंदिराच्या गाभार्‍यात व परिसरात एकावेळी 600 पेक्षा जास्त भाविकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
या नियमावलीत कोरोनासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांचा समावेश आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
 
 
आपत्ती व्यवस्थापन विभागातील राज्य कार्यकारी समितीचे सदस्य सचिव संदीप म्हणाले की, जिल्हा न्यायाधीशांतर्फे या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येईल, तसेच कोरोनासंदर्भात योग्य परिस्थिती नसल्याचे आढळल्यास मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकारही असतील. भाविकांना या यात्रेसाठी नावनोंदणी करणे अनिवार्य असेल, नोंदणी नसल्यास भाविकास वैष्णोदेवी यात्रेला जाता येणार नाही.
Powered By Sangraha 9.0