डांभूर्णी, ता.यावल : येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्यांच्या शेतात पिक पेरणीला जोमाने सुरुवात झाली आहे.
सध्या कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातल्याने त्यासोबतच सर्वसामान्य जनतेला आर्थिक झळ भासत असूनही शेतकरी मात्र पैशांची हातऊचल करुन शेतावर पीक पेरणी करीत आहे. या वर्षात शेतकर्यांच्या मालाला भाव न मिळाल्याने व शासकीय दर निघूनही व्यापार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांनी बागायती (केळी) पिकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहावयास दिसून येत आहे. या वर्षात मका, कापुस, ज्वारी या पिकांच्या पीक पेर्यात वाढ होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई व मजुरी रोजंदारीमुळे शेतकर्यांना शेती ना परवडणारी ठरत आहे. आजच मजुराची रोजंदारी पुरूषांना दोनशे रुपये तर महिलांना दीडशे रुपये रोजंदारी असल्याने व फवारणी काळात पुरुषांचा दोनशे पन्नास रुपये रोज असल्याने शेतकर्यांच्या डोळ्यांना भुरळ पडण्याची वेळ येत आहे. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावाने कापल्या जाणार्या केळीबाबत काही शेतकर्यांनी व्यापार्यांच्या व कमीशन एजंटाच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढत केळी पिकाऐवजी सिताफळ या बागांची लागवड केल्याचे दिसून येत आहे. यामुळे कदाचित या भागातील शेतकरी भविष्यात केळीऐवजी फळबागायतीकडे वळण्याचे चिन्ह दिसत आहे.