संसदेत दोन हात होऊन जाऊ द्या

    दिनांक : 28-Jun-2020
Total Views |


 

अमित शाह यांचा राहुल गांधींवर पलटवार

 

नवी दिल्ली : लडाखच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पलटवार केला आहे. आम्ही चर्चा करण्यासाठी घाबरत नाही. राहुल गांधी केव्हाही संसदेत येऊन आमच्याशी चर्चा करू शकतात. मात्र, जवान सीमेवर लढत असताना पाकिस्तानला आनंद होईल अशा प्रकारची वक्तव्ये करणे गैर असल्याचे शाह म्हणाले.

 
 

Amit_Shah_Rahul_Gandhi_1& 
 
 
राहुल गांधी यांनी भारत-चीन तणावाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा उल्लेख सरेंडर मोदी असा केला होता. यावर अमित शहा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, संसदेचे सत्र व्हायला हवे. चर्चा करायची असेल तर या आपण चर्चा करू. कोणीही चर्चेला घाबरत नाही. सन १९६२ पासून ते आतापर्यंतच्या स्थितीवर दोन हात होऊन जाऊ द्या. मात्र देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत असताना, सरकार एक भूमिका घेऊन ठोस पावले उचलत असताना अशा परिस्थितीत अशा प्रकारे पाकिस्तानला आनंद होईल अशी वक्तव्ये करायला नको.

 

अमित शाह पुढे म्हणाले की, केंद्र सरकार भारत विरोधी प्रचाराविरुद्ध लढण्यासाठी सक्षम आहे, मात्र इतक्या मोठ्या पक्षाचा एक माजी अध्यक्ष अशा प्रकारचे क्षुद्र राजकारण करतो हे पाहून दु:ख होते. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारत-चीन वादाबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. नरेंद्र मोदी हे वास्तवात सरेंडर मोदी आहेत असे वक्तव्य राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना केले होते.

 

या पूर्वी आणि नंतरही राहुल गांधी यांनी गलवान खोरे प्रकरणात सरकारला सतत प्रश्न विचारले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा रेडिओवरील कार्यक्रम सुरू होतानाही राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी चीनला कडक संदेश दिला आहे. भारत मैत्री करणेही जाणतो आणि उत्तर देणेही जाणतो, असे मोदी म्हणाले. भारतमातेकडे डोळे वर करून पाहणाऱ्यांना उत्तर मिळाले आहे, असेही मोदी म्हणाले.