गुवाहाटी : आसाममध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे राज्यात पूर आला असून १६ जिल्ह्यातील ७०४ गावांना पूराचा फटका बसला आहे. पावसाच्या पाण्यामुळे ब्रह्मपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सर्व जिल्ह्यातील उपायुक्तांना पूर बाधित भागात मदतकार्य वेगात करण्याचे निर्देश दिले आहेत.
उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सतत पाऊस आणि ब्रह्मपुत्रांच्या वाढत्या पातळीमुळे आलेल्या पुराने सुमारे २५ हजार लोक प्रभावित झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
एएसडीएमएनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा विभागांनी ६ जिल्ह्यांमध्ये १४२ मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे सुरु केली आहेत. यात १९ हजार हून अधिक लोक राहत आहेत. पुरात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील धेमाजी, तिनसुकिया, माजुली आणि डिब्रूगढ हे जिल्हे सर्वाधित प्रभावित झाले आहेत. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.