चोवीस तासासाठी संचारबंदी
तभा वृत्तसेवा
रावेर, 24 मार्च
रावेर शहरात दंगलीची जणु श्रृखंलाच सुरु झाली आहे.दर पाच वर्षानी जर शहरात दंगल होत असेल तर याचा कुठे तरी कायमचा बंदोबस्त करवा लागणार आहे. देशावर कोरोना’चा प्रादुर्भाव असतांना रावेरमध्ये दंगल करतांना दंगेखोरांना लाज कशी वाटली नाही अश्या तिखट भाषेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शहराच्या परीस्थितीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. दंगलीच्या पार्श्वभूमीवर ते रावेरात आले होते.
रविवारच्या रात्री रावेर शहरात दंगल उसळली होती त्यानंतर आज दुसर्या दिवशी मंगळवारी दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी दोन तासाची शिथिलता देण्यात आली .यावेळी शहरात बंदिस्त असलेल्या लोकांनी जिवनावश्यक वस्तुची खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये नागरीकांनी किराणा घेण्यासाठी तर इतर ठिकाणी भाजीपाला खरेदी,तर काहींनी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. दोन तास संपताच शहरात पुन्हा संचारबंदी लागू झाली.
सात दिवस पोलीस कोठडी
रावेर शहरात झालेल्या दंगल प्रकरणी रावेर पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात सतरा जणांना अटक केली आहे. त्यांना रावेर न्यायालयात हजर केले असता. आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
चोवीस तास संचारबंदी
शहरातील झालेल्या दंगलीमुळे मंगळवारी रात्री अकरा वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस तासासाठी संचारबंदी लागु करण्यात आली होती. शहरातील परिस्थिती अभ्यास करून प्रांतधिकारी अजित थोरबोले यांनी बुधवारी रात्री अकरा वाजेपर्यंत चोवीस ताससाठी एका आदेश अन्वये वाढविली आहे.