अष्टविनायका पैकी दुसरा गणपती सिद्धटेकचा सिद्धिविनायक : विशेष लेख

    दिनांक : 01-Sep-2022
Total Views |
गौरीपुत्र गणेश म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बाप्पा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या प्रथम पूजनीय बापाला अनेक नावाने संबोधले जाते.
 
 

sidhtek 
 
 
 
 
काल आपण अष्टविनायकापैकी पहिला गणपती म्हणजे मोरगावचा मोरेश्वर बद्दल माहिती पहिली . आज आपण दुसरा गणपती म्हणजे सिद्धटेकचा सिद्धिविनायका बद्दल माहिती पहाणार आहोत.
 
अशा या बाप्पाचे स्वयंभू ऐतिहासिक तसेच भक्ती परंपरेतील महत्त्वाची स्थाने म्हणजे महाराष्ट्रातील रायगड, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात मोरगाव, सिद्धटेक, पाली, महाड, थेऊर, लेण्याद्री ओझर व रांजणगाव या ठिकाणी आठ पवित्र व स्वयंभू गणपतीची विविध रूपे आहेत.
 
प्रत्येक मंदिराला त्याचे-त्याचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे. प्रत्येक मंदिरातील मूर्तीचे स्वरूप हे विलोभनीय आहे तसेच तिथल्या मंदीरातील ऐतिहासिक बांधकाम व कलाकुसर उल्लेखनीय आहे.
 
भक्तांमध्ये अष्टविनायक यात्रेचे विशेष महत्त्व आहे या यात्रेची सुरुवात मोरगावचा मोरेश्वरापासून सुरू होऊन पुन्हा इथे येऊन या यात्रेचा शेवट केला जातो. तर अष्टविनायक प्रत्येक स्थानाचे महत्त्व, तिथली आख्यायिका व मंदिर याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
 
सिद्धिविनायक:-
 
उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जीची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो तसेच त्याचे सोवळेही कडक असते. तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते.
 
बाप्पाची ही मूर्ती तीन फूट उंच आहे व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धी व सिद्धी विराजमान आहेत.
भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला एकवीस दिवस 21 प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्त्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्णत्वास जाते.
 
मंदिर:-
 
सध्या अस्तित्वात असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर यांनी केला गाभाऱ्यात असलेल्या सिद्धिविनायकाच्या मखर पितळी आहे तसेच त्यावर चंद्र सूर्य तसेच गरूडची कलाकृती साकारली आहे.
 
आख्यायिका:-
 
भगवान विष्णू ध्याननिद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटभ दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणीत होते.
 
त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांची ध्याननिद्रा भंग करून मधु व कैटभ यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली.
 
त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीशी मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटभाचा पराभव केला.