मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांना पत्र : शेतकऱ्यांनो तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ, आत्महत्या करु नका

    दिनांक : 23-Aug-2022
Total Views |
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशात शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आजच, मंगळवारी एका शेतकऱ्याने थेट मंत्रालयासमोरच स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.

Eknath Shinde Letter 
 

 
मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक साद घालताना आपल्या पत्रात लिहीलं की,
माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो,
 
सर्वाना सप्रेम जय महाराष्ट्र!
 
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करता आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.
 
परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं. तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात... हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं....वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय...
 
लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे... तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की 'रडायचं नाही, लढायचं....'
 
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं....
 
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना...
 
चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया!
जय महाराष्ट्र !
 
आपलाच,
 
(एकनाथ शिंदे)
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य