संवेदनशील आणि कर्तबगार नेता...

    दिनांक : 13-Aug-2022
Total Views |
जुलै २०१९ पासून भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा लीलया सांभाळली. आता फडणवीस-शिंदे सरकारमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अभाविप ते भाजप आणि आता पुन्हा कॅबिनेट मंत्री असा चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणारा हा लेख...
 
 
 
neta
 
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा प्रचार अभ्यास वर्ग ऑगस्ट १९८० मध्ये जालना येथे झाला. या वर्गात अभाविपचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून चंद्रकांत पाटील हा मुंबईचा तरुण काम करेल, अशी घोषणा करण्यात आली. विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करणे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकासारखेच काम असते. संघटनेने दिलेले दायित्व पूर्ण शक्तीनिशी पूर्ण करायचे आणि कशातही गुंतून पडायचे नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण संघटनेसाठी द्यायचा, पण त्या बदल्यात स्वतःसाठी काही मिळवायचे नाही. केवळ भगवे कपडे नाहीत, नाही तर एखाद्या संन्याशासारखे जगायचे. पण, या तरुणाने ही जबाबदारी स्वीकारली.
 
अभाविप घडविणारे तत्वचिंतक यशवंतराव केळकर यांच्यापासून या तरुणाला प्रेरणा मिळाली होती. त्यानंतर १९९४ पर्यंत सलग चौदा वर्षे चंद्रकांत पाटील देशभर भ्रमण करत होते, कार्यकर्ते जोडत होते आणि संघटनेचे नवनवे उपक्रम अमलात आणत होते, असे प्रेमाने कार्यकर्ते जोडता जोडता चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांसाठी मोठा भाऊ झाले. कार्यकर्ते त्यांना ‘दादा’ म्हणून हाक मारू लागले. अजूनही ते सर्वांचे ‘दादा’ आहेत.दादांची विद्यार्थी परिषदेची १४ वर्षे म्हणजे मंतरलेले दिवस. परिषदेतर्फे १९९० मध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी ‘चलो काश्मीर’ ही मोहीम राबविली होती. त्याच्या अंतर्गत २० हजार तरुणांनी श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा फडकाविण्याची योजना होती. त्या मोहिमेचे नेतृत्व चंद्रकांतदादांनी केले. श्रीनगरकडे जाणार्‍या तरुणांना उधमपूर येथे अटक झाल्यानंतर दादांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तरुणांनी दिल्लीकडे मोर्चा वळविला. तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांची भेट घेतली व त्यांना तिरंगा ध्वज देऊन लाल चौकात फडकविण्यास सांगितले. अशा अनेक घडामोडी झाल्या. विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा असे अनेक कर्तबगार मित्र परिषदेच्या कामामुळे जोडले गेले.
 
संघर्ष हीच जगण्याची रीत
 
मुंबईतील रे रोड परिसरात प्रभूदास चाळीत जन्माला येऊन लहानाचा मोठा झालेल्या या तरुणासाठी संघर्ष हीच जगण्याची रीत आहे. चिवटपणे प्रयत्न करायचे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची हे लहानपणीच त्यांच्या अंगवळणी पडले. आई-वडील दोघेही मिल कामगार होते. घरची परिस्थिती सामान्य होती. तरीही मुंबईत शाळेचे शिक्षण घेतले. सिद्धार्थ महाविद्यालयात ‘बी. कॉम’ची पदवी घेतली आणि ऐन २१व्या वर्षी संघकार्याला त्यांनी वाहून घेतले.विद्यार्थी परिषदेचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम थांबविल्यावर दादा आपल्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यात परतले. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. शेतीमध्ये लक्ष घातले. तरीही संघाचे काम सुरूच होते. अशा परिस्थितीत २००४ साली प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या प्रमुख नेत्यांनी दादांना भारतीय जनता पार्टीच्या कामात सक्रिय होण्याची सूचना केली आणि दादांचे राजकीय जीवन सुरू झाले.
 
संघटनेत विविध पदांवर काम करत असताना पक्षाने दादांना २००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली. हा मतदारसंघ भाजपचा होता. पण, पक्षाने आधीच्या निवडणुकीत गमावला होता. दादांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि २००८ साली विजय खेचून आणला. चंद्रकांतदादा पाटील आमदार झाले. सहा वर्षे विधिमंडळात आक्रमकपणे बाजू मांडल्यानंतर त्यांना २०१४ साली पक्षाने पुन्हा संधी दिली व त्यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजय मिळविला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे महाराष्ट्रात २०१४ साली परिवर्तन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपचे सरकार आले. त्यावेळी ध्यानीमनी नसताना केंद्रीय नेतृत्वाने दादांचा समावेश राज्याच्या मंत्रिमंडळात केला. रे रोडला चाळीत लहानाचे मोठे झालेले दादा राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले. आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली तरी दादांनी येथेही इतके झपाटल्यासारखे काम केले की, त्यांच्यावरील विविध खात्यांचा कार्यभार वाढतच गेला. सहकार, पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन, कृषी, फलोत्पादन अशा आठ खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला.
 
दादांनी विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि ते अमलात आणले. शेतकर्‍यांचा जमिनीचा सातबाराचा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून त्यांचे तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद होण्याची योजना पूर्ण करावी, म्हणून दादांनी अधिकार्‍यांना ज्या पद्धतीने कामाला लावले ते पाहण्यासारखे होते. पण, ही योजना पूर्ण करूनच घेतली. असे अनेक निर्णय झाले.दादांना आयुष्यभर समाधान वाटेल असे एक काम झाले. ते मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. मराठा आरक्षणासाठी जोरदार मागणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने होते. त्यांच्या पाठबळाच्या जोरावर दादांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रात्रंदिवस काम केले. फडणवीस सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकवले आणि त्याची अंमलबजावणीही केली. हे करतानाच मराठा समाजासाठी ‘सारथी योजना’, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे फी सवलत अशा अनेक योजनांची अंमलबजावणी झाली.
 
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ढिलाई केली नसती, तर मराठा आरक्षण आजही टिकलेले दिसले असते. खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा आले असते आणि दादा मंत्रिमंडळात असत, तर आरक्षण गमावण्याची वेळ आलीच नसती.खरे तर २०१९ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने १६१ जागा जिंकत पूर्ण बहुमताने जिंकली होती. दादा जुलै २०१९ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले होते व त्यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा विजय होता. पण, दुर्दैवाने शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि निवडणूक जिंकूनही भाजपला विरोधी पक्ष व्हावे लागले.
 
प्रदेशाध्यक्ष म्हणून दादांसाठी हा कसोटीचा काळ होता. निवडणूक जिंकूनही सत्ता गमावल्यामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला होता. अशा परिस्थितीत पक्षाच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवायचे आणि त्यांना विरोधी पक्ष म्हणून जनआंदोलनांसाठी सज्ज करायचे, हे मोठे आव्हान होते. पण, दादांनी ते पेलले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने अडीच वर्षांत अशी काही एका पाठोपाठ आंदोलने केली की, त्याची नोंद इतिहास करेल. प्रभावी विरोधी पक्ष कसा असतो, हे भाजपने दाखवून दिले. याच काळात भाजपने पंढरपूरची विधानसभेची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेचून घेतली. जिल्हा परिषद, नगरपंचायती, ग्रामपंचायती यांच्या निवडणुकात भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. यंदा जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपने ज्याप्रकारे अवघड विजय मिळविला त्यामुळे सर्वच जण आवाक झाले.
 
भाजप आता पुन्हा सत्तेवर आला आहे. दादाही 9 ऑगस्ट रोजी मंत्री झाले. परंतु, विरोधी पक्ष म्हणून अडीच वर्षांच्या कालावधीत पक्षाने जे प्रभावी काम केले, त्यामागे पक्षाची शिस्त, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनेची बांधिलकी आहे. काळ प्रतिकूल असला तरीही भाजपचे नेते आणि कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले. जणू काही भाजपची सत्ता आहे आणि महाविकास आघाडी विरोधात आहे; अशा रितीने भाजपचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक राहिले आणि अजेंडा ठरवत राहिले. पक्ष संघटनेसाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. संघटन आणि संघर्ष या बाबतीत भाजपने ठसा उमटवला.
 
राज्यात आणि देशात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे दादा मनाने अत्यंत संवेदनशील आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांनी पुण्यात स्वतः एक ‘कोविड सेंटर’ उभे केले होते. रोजगार गमावलेल्या अनेकांना पुन्हा काही रोजगार मिळवून देताना त्यांनी आर्थिक मदतही केली होती. सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे अशा भावनेने वावरणारे दादा त्यांनी केलेल्या सेवाकार्याची आणि मदतीची चर्चा करत नाहीत. अनेकदा त्यांनी मदत केलेले लोक त्यांना सांगतात की, “तुमच्या लक्षात नसेल पण तुम्ही मला ही मोलाची मदत केली होती.” त्यामुळेच विविध आजारांनी ग्रासलेल्या आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी ‘सावली केअर सेंटर’ हा त्यांनी चालविलेला प्रकल्प फारसा चर्चेत नसतो.
 
मुळात संघाचे सेवेचे संस्कार असल्याने दादांनी राजकारण सांभाळून असे अनेक प्रकल्प चालविले आहेत. त्यांनी कळत-नकळत मदत केलेल्या असंख्य लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत. म्हणून तर कितीही वाद झाले, वादळे उठली आणि संकटे आली तरी दादा त्यातून नेहमी सहीसलामत बाहेर पडतात आणि त्यांची कोंडी करू पाहणारे हताश होतात.
 
- डॉ. दिनेश थिटे