जळगाव : अजमेर येथे दर्शनासाठी गेलेल्या शहरातील लक्ष्मीनगर भागात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे . यामध्ये चोरट्यांनी 43 ग्रॅम वजनाने सोने आणि 15 भार वजनाचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवीरी समोर आली. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त -
जळगाव येथील लक्ष्मी नगरात राहणारे सरफराज इस्माईल तडवी हे 16 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घराला कुलूप लावून भुसावळ येथील नातेवाईकाकडे गेले होते. 17 जुलै रोजी तडवी कुटुंबीय भुसावळ येथून रेल्वेने अजमेर येथे रवाना झाले.त्यानंतर सहा दिवस त्यांचे घर बंद होते. हीच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरात घरफोडी केली. शुक्रवारी तडवी कुटुंबीय जळगावला परतले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. दरवाजाला लावलेले कुलूप तोडण्यात आले होते. त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरुमधील कपाट उघडे होते.त्यांच्या कपाटातील दागिने चोरले गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
तडवी यांच्या घरातील कपाटातून 36 हजार 400 रुपये किंमतीचा 13 ग्रॅम वजनाचा नेकलेस, 33 हजार 600 रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची मंगलपोत, 14 हजार रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची डोरल्याची पोत, 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे टोंगल, 3 ग्रॅम वजनाची अंगठी, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असे एकूण 43 ग्रॅम वजनाचे दागिने व लहान मुलाचे 15 भार वजनाची चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 55 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरीला गेला.