जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारास अद्याप मुहूर्त लागलेला नाहीत. लवकरच शपथविधी होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यातच पाचोरा तालुक्यातून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत.
शपथविधीच्या १७ दिवसानंतर देखील सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे दोघेच सांभाळत आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे लागले आहे. शिंदे गट आणि भाजपात मंत्रीपदाची विभागणी अद्याप जाहीर झाली नाही मात्र त्यापूर्वीच आपल्याला मंत्रीपद मिळावे यासाठी आमदारांकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांमध्ये पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. शिंदे सरकारमध्ये आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळावं यासाठी शक्तिप्रदर्शन होणार आहे. मोठ्यासंख्येने कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले असून पाटलांना मंत्रिपद मिळेल अशी समर्थकांना अपेक्षा आहे.