- सर्वात जास्त 107.2 भडगांव
- सर्वात कमी 30.5 टक्के बोदवड तालुक्यात पाऊस
- संततधार पावसामुळे बहुतांश प्रकल्प पाणीपातळीत वाढ
- काही ठिकाणी पिकांना जीवदान तर काही ठिकाणी मातीमोल
- प्रकल्पांमधून मोठया प्रमाणावर विसर्ग
जळगाव : जिल्ह्यात मंगळवार 5 जुलैपासून मान्सूनचे दमदार पुनरागमन झाले आहे. यामुळे आतापर्यत गेल्या आठ ते दहा दिवसात जुलैच्या सरासरीच्या 70.7 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली असल्याचे जिल्हा कृषी विभागाने म्हटले आहे तर दुसरीकडे राज्यासह जिल्हयात आठ दहा दिवसांपासून ढगाळ वातावरणासह सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सूर्यदर्शन झालेले नाही, तसेच जिल्ह्यातील मोजके प्रकल्प वगळता मोठ्या प्रकल्पातील पाणीपातळी देखिल सरासरी निम्मेच्यावर गेली आहे.
सर्वात जास्त भडगांव 107.2 तर सर्वात कमी बोदवड तालुक्यात 30.5 टक्के
जिल्हयाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान सरासरी मि.मी.आहे. जुलै महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 189.2 मि.मी. असून जिल्ह्यात गुरूवारी 32.9 मि.मी. तर जुलैच्या 14 दिवसांत 133.8 मि.मी.म्हणजेच सरासरी 70.7 टक्के पावसाची नोंद विविध कृषी मंडळ व तहसिल स्तरावर झाली आहे.
सरासरी पाऊस
तालुका | पाऊस | आतापर्यत पर्जन्यमान | टक्के |
जळगाव | 35.9 | 188.2 | 85.9 |
भुसावळ | 46.2 | 86 | 44.1 |
यावल | 50.9 | 127.2 | 62.1 |
रावेर | 54.2 | 120.4 | 65.8 |
मुक्ताईनगर | 51 | 105.6 | 60 |
अमळनेर | 32.7 | 114.7 | 61.8 |
चोपडा | 49.3 | 156.8 | 73.2 |
एरंडोल | 18.2 | 124.7 | 65.1 |
पारोळा | 12.2 | 116.4 | 63.8 |
चाळीसगाव | 15.3 | 135.9 | 86.2 |
जामनेर | 26.1 | 142.8 | 72.2 |
पाचोरा | 18 | 173.2 | 96.2 |
भडगाव | 25.2 | 185.6 | 107.2 |
धरणगाव | 30.1 | 115.1 | 50.8 |
बोदवड | 34.08 | 62.0 | 30.5 |
एकूण सरासरी | 32.9 | 133.8 | 70.7 टक्के |
अंकूरलेल्या पिकांना जीवदान तर काही ठिकाणी मातीमोल
जिल्हयात बहुतांश ठिकाणी मान्सूनच्या सुरूवातीला बागायती कपाशी वाणाचे तसेच कोरडवाहू कपाशी वाणाची धुळपेरणी करण्यात आली होती. मान्सूनपूर्व तसेच मृग नक्षत्रावर हजेरी लावणार्या पावसाने जूनच्या सुरूवातीलाच दडी मारल्यामुळे अंकुरलेली रोपे कोमेजण्याच्या मार्गावर होती. परंतु जुलैच्या पहिल्या टप्प्यातच मान्सूनचे दमदार पुनरागमन झाले असून गेल्या आठ दहा दिवसांपासून संततधार पाउस सुरू आहे. या संततधार पावसामुळे काही ठिकाणी पिकांना जिवदान मिळाले आहे, तर काही ठिकाणी संततधार पाऊस आणि सूर्यदर्शन न झाल्यामुळे नव्यानेच पेरणी होउन अंकूरलेली रोपे जमीनीतच सडण्याच्या मार्गावर आहेत.