जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणाचे वरच्या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे आज सकाळी धरणाचे 4 दरवाजे पुर्ण उघडले आहेत. तर 20 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले आहेत.
मध्यप्रदेश, विदर्भात होत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. तर मागील गेल्या दीड महिन्यापासून हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने सातत्याने धरणाची पातळी वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील मागील दोन तीन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे.
३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
पाऊस सुरूच असल्याने धरणातील पाणी पातळी 209.68 मीटर इतकी झाली आहे. यामुळे आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास हतनूर धरणाचे चार दरवाजे पुर्ण तर वीस दरवाजे एक मिटरने उघडले आहेत. यातून ३८ हजार १०५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे. यामुळे तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.