मुंबई - राज्य सरकारच्या आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतराचा प्रस्ताव दिला. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घ्यावा असं परब यांनी सांगितले. औरंगाबादचं नामांतरण संभाजीनगर करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमोर आज परबांनी ठेवली आहे. याबाबत उद्या निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याची शिवसेनेची जुनी मागणी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा गाजत आहे. मुख्यमंत्री औरंगाबाद येथील सभेत नामांतराची घोषणा करतील, अशी आतुरता सर्वांना होती. मात्र आधी विकास, मग नामांतर असं म्हणत ठाकरेंनी जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या सभेत हा विषय पुढे ढकलला.
एकीकडे ठाकरे सरकार आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असताना औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दा काढून शिवसेनेन टायमिंग साधल्याची चर्चा आहे. तसेच हा प्रलंबित प्रश्न नेमकं यावेळीच परबांना का सुचला असावा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. प्रस्ताव दिलेला असला तरी असला नेमका हा विषय कधी मार्गी लागणार ? हे अद्याप तरी निश्चित नाही.