मुंबई : एकीकडे शिवसेनेकडून बंडखोरांना कारवाईचा इशारा देण्यात येत असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी पुढाकार घेत बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून मनाची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत ४१ आमदारांना गुवाहटी येथे नेवून भाजपा सोबत युती करून सरकार स्थापन करण्याची मागणी केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर संकट ओढावले आहे. बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय संकट गडद होत चालले आहे. शिंदे समर्थक आणि ठाकरे समर्थक दोन्ही बाजूने सध्या जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.