विविध जिल्ह्यात नुपूर शर्मा विरोधात आंदोलन, ' मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद

    दिनांक : 10-Jun-2022
Total Views |
नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांनी मुस्लीम धर्मगुरु मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटले आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नुपूर शर्मा विरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. नुपूर शर्माच्या वक्तव्याबाबत औरंगाबाद, परभणी अशा विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शन केली जात आहेत.
 
 

nupur
 
 
 
 
सोलापूर पाठोपाठ औरंगाबादेतही तीव्र पडसाद
 
सोलापूर पाठोपाठ औरंगाबादेतही तीव्र पडसाद उमटले आहेत. नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात औरंगाबादमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी निदर्शने केली. विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जमले.
नुपूर शर्मा यांनी पैगंबर यांच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून परभणीत मुस्लिम समाज आक्रमक झाला आहे.
 
मुस्लिम बांधवांकडून परभणी बंदची हाक देण्यात आली होती. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नुपूर शर्माला अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
 
मोहम्मद पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ देशभरात मुस्लीम समाज रस्त्यावर
 
. शुक्रवारच्या नमाजनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने सुरू आहेत. तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोकं आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याच समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झालेल्या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे. डीजीपी डीएस चौहान, कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रमुख प्रशांत कुमार आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी हे लखनऊ पोलिस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित आहेत. प्रयागराजमध्ये अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. जाळपोळही झाली आहे. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. , पोलिसांकडून तगडा बंदोबस्त देण्यात आला आहे.
दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद,सोलापूर,जालना आणि कोल्हापुरात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. तर सोलापुरात सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणाचा जमाव पाहता पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर आंदोलनाला एवढी गर्दी होईल याचा पोलिसांना अंदाज आला नसल्याचे बोलले जात आहे.