नाशिक : जिल्ह्यातील बालविवाहाच्या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेत बाल विवाहास आळा बसण्यास नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महिला व बालकल्याण विभाग आणि यूनिसेफ या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सद्य परिस्थितीत ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण वाढीव असून तो रोखणे अत्यंत गरजेचे आहे. बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे, अंगणवाडी सेविकांनी किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा, ग्रामसभा यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे असे निर्देश या बैठकीत दिले.