संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली ? सरसंघचालक मोहन भागवत यांना जनाब म्हणणार का ? संजय राऊत यांचा सवाल

    दिनांक : 22-Mar-2022
Total Views |
 नागपूर : RSSलाही जनाब संघ म्हणायचं का, असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊतयांनी केला आहे. संघाने मुस्लिम सेलची स्थापना का केली, असा सवाल त्यांनी केला आहे. मुस्लिमांचा डीएनए हिंदूच आहे असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यांनाही जनाब म्हणणार का असा टोला त्यांनी मारला. दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती, असं संजय राऊत यांनी म्हटल आहे. मलिकही राजीनामा देणार नाहीत, असे राऊत यांनी ठणकावले.
 

raut
 
 
 
शिवसेनेने हिंदुत्व कायम आहे. ते सोडलेले नाही. आमचा प्रत्यक्ष कागदपत्रांवर विश्वास आहे. पेन ड्राइव्ह, डिजिटल वगैरे गोष्टी नागपुरात चालतात. विदर्भात शिवसेना संघटन फार उत्तम आहे. युतीच्या काळात विदर्भाच्या जागा भाजपने घेतल्या. आमची विदर्भात पीछेहाट झाली. भाजपने चार राज्यात नवीन काय जिंकले. पंजाब जिंकले असत तर ते जिंकले, असे आम्ही म्हटले असते. आम्ही काहीच गमावले नाही, असे संजय राऊत म्हणाले.
 
केंद्र सरकारकडून इडीचा दुरुपयोग
 
शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. भाजप देशभरात सुडाचे राजकारण करत आहेत, असा आरोप करत महाराष्ट्र दिल्लीसमोर वाकणार नाही. केंद्र सरकारकडून इडीचा दुरुपयोग करत आहे. महाराष्ट्रातील पोलीसदेखील आता काम करणार, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.
 
केंद्रीय तपास यंत्रणांपेक्षा महाराष्ट्र पोलीस सक्षम. पीओके देशात कधी आणत आहात त्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. सिनेमा काढून काश्मिरी पंडितांची घर वापसी होऊ शकत नाही. संघाचादेखील मुस्लिम सेल आहे. मग संघाला जनाब संघ म्हणणार का ? संघाने मुस्लिम सेल का काढला, आदी प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले.