मुंबई : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी आणि मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू बकर याला भारतीय तपास यंत्रणांनी संयुक्त अरब अमिरात (युएई) मध्ये अटक केली आहे. २९ वर्षांच्या तपासानंतर भारतीय यंत्रणांनी हे यश मिळवले आहे. १२ मार्च १९९३ रोजी मुंबई मध्ये १२ साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यात २५७ जणांचा मृत्यू तर सुमारे १४०० जण जखमी झाले होते.
अबू बकर हा या खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक होता. त्याच्यावर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी प्रशिक्षणामध्ये सहभाग, दाऊद इब्राहिमसोबत कटाची योजना तयार करणे, स्फोटांसाठी आरडीएक्स ची वाहतूक करणे हे आरोप होते. अबू बकर याला यापूर्वी २०१९ मध्ये युएई मध्ये पकडण्यात आले होते पण तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता. आता तब्ब्ल २९ वर्षांनी त्याला पकडण्यात यश आले आहे. अबू बकर ला भारतात घेऊन येण्याची प्रक्रिया सुरु केली असून लवकरच त्याला भारतात आणले जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.