रशिया- युक्रेन युद्ध: युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय अडकले

भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु

    दिनांक : 25-Feb-2022
Total Views |
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धास सुरुवात झाली आहे. चारी बाजूंनीं हल्ला झाल्याने युक्रेनच्या सर्व हवाईसीमा बंद करण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये सध्या १८ हजार भारतीय अडकले असल्याची माहिती मिळत आहे. "या सर्व भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली आहे. हवाईसीमा बंद असल्याने दुसऱ्या कुठल्या मार्गाने भारतीयांना परत आणायचे प्रयत्न भारत सरकार करत असल्याची माहिती मिळत आहे.

Indian Students in Ukraine 
 
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेनची राजधानी असलेल्या कीव शहरावर बॉम्बहल्ले होत आहेत. याच पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय नागरिकांना याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सावधानतेचा सूचना देत असल्याचे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे. या भारतीय नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
 
रशियाकडून युद्धास सुरुवात
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन वर गुरुवारी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील सर्वच महत्वाच्या शहरांवर हल्ला सुरु केला. युक्रेनची राजधानी असलेल्या कीववर बॉम्बहल्ले सुरु झाले. युक्रेनच्या लष्करानेदेखील जोरदार प्रतिकार सुरू केला असून आतापर्यंत ५० रशियन सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला आहे.