पुणे : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली आहे. काल शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि बोर्ड अध्यक्ष यांच्यात बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. धारावीत झालेल्या आंदोलनानंतर परीक्षेत काय बदल होणार का? असा सवाल सर्वांच्या मनात उपस्थित झाला होता, परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी आंदोलनावेळी करण्यात आली होती. दोन दिवसापूर्वीच हजारो विद्यार्थी अचानक शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जमले होते, त्यांतर या विद्यार्थ्यांचा मोठा उद्रेक झाल्यचे पाहायला मिळाले. त्यानंतर परीक्षांबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वसन शिक्षमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते, त्यामुळे परीक्षांचं काय होणार? परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार? असा संभ्रम अनेक विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाला आहे.
आंदोलनाने वेधून घेतले संपूर्ण देशाचे लक्ष
धारावीतल्या विद्यार्थी आंदोलनाने फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन एवढं आक्रमक होतं की सुरूवातील राज्य सरकारला घाम फुटला. यानंतर राज्यचे पोलीस खातेही खडबडून कामला लागले आणि या आंदोलनामागील शक्ती शोधण्यास सुरूवात झाली. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला दोषी धरत हिंदुस्तानी भाऊला अटक केली आहे. कोर्टाने त्याला तीन दिवसांची कोठडीही सुनावली आहे. मात्र या आंदोलनानंतर भाजपनेही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता पोलीस लाठीमार करत आहेत, असी टीका भाजपकडून करण्यात आली. त्यामुळे परीक्षांबाबत काय करायचं? यासाठी शिक्षण विभाग आणि राज्य सरकारकडून काही तातडीच्या बैठका घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा सर्वांच्या मनात धडकी भरवली होती, त्यामुळेच परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी जोर धरत होती. मात्र आताचे लेटेस्ट आकडे पाहिल्यास कोरोनाचा जोर बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसतंय आणि गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाच्या परीक्षा तरी ऑफलाईन घ्याव्यात यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. हेच डोळ्यासमोर ठेवून परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.