भारताचा स्वातंत्र्यलढा अनेकदृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्येही महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद असा आहे. १८९७ मध्ये पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर झालेले अन्याय - अत्याचार, निकृष्ट दर्जाचे प्लेग निवारण कार्य करणारा प्लेग कमिश्नर कॅप्टन रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर २२ जून, १८९७ रोजी बंदुकीने गोळ्या झाडूनचाफेकर बंधूंनी केलेला वध - या घटनांना यावर्षी १२४ वर्षे पूर्ण होऊन त्या १२५ व्या वर्षात पदार्पणकरतील. मराठी मनांमध्ये अस्मिता जागृत करणारी आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी ही घटना इतिहासातील पानांवर कायमची कोरली गेली आहे. मात्र या घटनेत सहभागी असलेले स्वातंत्र्यप्रेमी खंडेराव विष्णू साठे यांची माहिती मात्र सर्वश्रुत होऊ शकली नाही.
पूना हायस्कूलचा हा सतरा वर्षांचा विद्यार्थी आणि तेजस्वी तरुण म्हणजे खंडेराव विष्णू साठे. या खंडेराव साठेंवर वासुदेव चाफेकरांचा विशेष स्नेह होता. देशद्रोही द्रविड बंधूंना धडा शिकवण्यासाठी वासुदेव चाफेकरांनी एक योजना आखली होती. या कार्यात खंडेराव साठे यांनी अनमोल सहकार्य केले. त्यात द्रविड बंधू मारले गेले. रँड मारला गेला तेव्हा ते तेथे उपस्थित नव्हते,परंतु दुसर्या दिवशी दामोदर चाफेकरांनी टिळकांना निरोप पाठवायला सांगितले. रॅण्डचा खून केल्यानंतर खंडेराव साठे यांनी पुण्यातील विंचणकर यांच्या घरात टिळकांची भेट घेत ‘गणेशखिंडीतला गणपती पावला’ असा सूचक संदेश टिळकांना सांगितला. त्यावर ‘आता नीट हुशारीने वागा,’ असे टिळक त्यांना म्हणाले होते.
द्रविड बंधूंच्या हत्येच्या प्रकरणात ११ फेब्रुवारी, १८९९ रोजी खंडेराव साठे यांना अटक करण्यात आली. त्यांनीसुद्धा अत्यंत निर्भय वृत्तीने हा गुन्हा केल्याचे स्वीकारले. पुढे द्रविड बंधूंच्या हत्येच्या खटल्यात न्यायालयाद्वारे वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर खंडेराव साठे यांना दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. साठेंना ठाणे, येरवडा, सिंध, हैदराबाद, कर्णावती तुरुंगातही शिक्षा झाली.
या शिक्षेच्या काळात त्यांना दररोज ३५ पौंड पीठ दळण्याचे काम देण्यात आले होते. तुरुंगात त्यांना इतर तर दूरच - नातेवाईकांनाही भेटू दिले जात नसे. १२ मे १८९९ रोजी वासुदेव आणि महादेव रानडे यांना येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.
कालांतराने १९६० मध्ये खंडेराव विष्णू साठे यांचेही निधन झाले. मात्र त्यांचे देशकार्य आणि देशासाठी त्यांनी सहन केलेल्या यातना काळाच्या ओघात विस्मरणात गेल्या. खंडेराव विष्णू साठे यांचा अतुलनीय त्याग आणि शौर्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!