चारित्र्याच्या संशयावरून चार्जरच्या वायरने पतीने केला पत्नीचा खून

    दिनांक : 02-Oct-2022
Total Views |
आरोपी पती स्वतःहुन पोलीस स्टेशन मध्ये हजर

जळगाव : शहरात खुनाचे सत्र  सतत आठ पंधरा दिवसानंतर सुरूच आहे. अशातच निमखेडी  शिवारातील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने पत्नी कविताचा चारित्र्याच्या संशयावरून मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून (Crime) केल्याची घटना घडली. चारित्र्याच्या  संशयावरून पत्नीशी भांडण झाल्यानंतर ही घटना घडली. पत्नीचा खून करून पती जितेंद्र स्वतःहून पोलिस (Police) ठाण्यात हजर झाला. मी, पत्नीला मारले म्हणत त्याने सर्व हकिगत सांगितली.

khun
 
 
 
जळगाव शहरातील आहुजानगर परिसरातील शिवधाम मंदिराजवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र व कविता पाटील हे दांपत्य वास्तव्यास आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी हे दांपत्य बांभोरी येथून जळगावात (Jalgaon Crime) राहण्यासाठी आले होते. शनिवारी (ता.१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती जितेंद्र याने पत्नी कविता हिचा मोबाईल चार्जरच्या केबलच्या साह्याने (Crime News) गळा आवळला.
 
गळफास दिल्यावर पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर पती हा स्वतःच तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला. त्यानेच पोलिसांना मी पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. संशयितास दीड वर्षांची मुलगी आहे. घटनेची माहिती पसरताच अपार्टमेंटजवळ एकच गर्दी झाली होती.
 
पोलिस ठाण्यात हजर झालेला संशयित जितेंद्र याने पोलिसांनी माहिती देताना सांगितले, की तो मूळ बांभोरी (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहे. त्याचा आणि कविताचा साधारण तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर पत्नीच्‍या वर्तणुकीबाबत संशय आला. त्यासंदर्भात पत्नीला अनेकवेळेस समजावले. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. गावात बदनामी नको म्हणून तिच्यासाठीच मी गाव सोडून तिचे माहेर असलेल्या शिवधाम मंदिर परिसरात स्थायिक झालो. मात्र, पत्नीच्या वागणुकीत बदल झाला नाही. पण, ती उलट मलाच आत्महत्या करून फसवून टाकण्याची धमकी देत होती. आजही तिला बोललो तरी तसेच मी मरून जाते, असे सांगत वाद घालायला लागली. त्यातून वाद टोकाला गेला अन्‌ मोबाईल चार्जरच्या वायरने गळफास देत मीच तिची हत्या केल्याचे संशयित जितेंद्रने पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
 
दीड वर्षांची चिमुरडी झाली अनाथ
 
जितेंद्र, कविता यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघेही सुरवातीला आनंदात संसार करत होते. त्यांच्या संसार वेलीवर चिमुरडीच्या रूपाने कळी खुलली होती. तीन वर्षे संसाराला होत नाही, तोवर कसले खूळ डोक्यात शिरले अन्‌ आजचा भयानक दिवस उजाडला. दीड वर्षातच आईची पित्याने हत्या करून टाकली. आई तर गेलीच पिताही जेलमध्ये राहील, इतक्या लहान वयात मुलीचे कसे होईल, या विचारांनीच नातेवाइकांना हुंदके अनावर झाले होते.