नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णाची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने चिंतेत भर टाकली आहे. मागील 24 तासांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्णाची भर पडली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यात निर्बंध कडक करण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नियमावलीमध्ये बदल केला आहे. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाला सात दिवसाचे क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आले आहे. सात दिवसाचे क्वारंटाईन संपल्यानंतर आठव्या दिवसी कोरोना चाचणी करण्यात येईल, असे नियमावलीत म्हटले आहे.
नो रिस्क देशातून आलेल्या प्रवाशांनाही हे नियम लागू होणार आहेत. प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट Air Suvidha या संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल. सात दिवसाचं क्वारंटनाई संपल्यानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास आणखी सात दिवस घरीच क्वारंटाईन राहावे लागेल. जर सात दिवसाच्या क्वारंटाईननंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास जिनोम चाचणी केली जाईल. संपर्कातील आलेल्या सर्वांची चाचणी केली जाईल, तसेच त्यांना क्वारंटाईनही राहावे लागेल.
ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने ओमायक्रॉन व्हेरियंटला धोकादायक असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. देशात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. २५ पेक्षा जास्त राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. देशभरात सध्या तीन हजार पेक्षा जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.