नंदुरबारला स्वामी समर्थ केन्द्रातर्फे प्रत्यक्ष बांधावर सेंद्रीय शेती प्रशिक्षण

    दिनांक : 30-Jan-2022
Total Views |
नंदुरबार : जीवन जगण्यासाठी सकस व पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सेंद्रिय व जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे यासाठी कृषी विभागात कार्य करणारे अधिकारी व शेतकरी यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे यासाठी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकरी सेवेकरींची कार्यशाळा श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग व कृषी संशोधन केंद्र दिंडोरी प्रणित गुरुपुत्र व आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक व कृषी संशोधन प्रशिक्षण केंद्र, चौपाळे रोड, नंदुरबार येथे दिंडोरी प्रतिनिधी सेवेकरी सचिन माने, पांडुरंग हटकर, आनंद काळे व नंदुरबार जिल्हा केंद्र प्रतिनिधी जीवन देवरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
 
swami  
 
 
या कार्यशाळेतील मार्गदर्शनात सेंद्रिय शेती करण्यासाठी वैदिक विज्ञान व अध्यात्माची सांगड घालून शेती केल्यास पीकामध्ये व अन्नामध्ये सात्त्विकता येत असते. कमी खर्चात होणारी शेती, सेंद्रिय शेतीचे महत्व, गांडूळ खताचे महत्व, परिसरात व पर्यावरणात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीनुसार पारंपारिक पद्धतीने होणारी शेती पद्धत, जल संधारणाचं व बांधावरील झाडे यांचं महत्त्व, बाराबलुतेदार, मराठी अस्मिता, रानभाज्या, कृषी विभाग अंतर्गत शासनाच्या विविध योजना जैविक शेती व अन्न,सीड बँक आदी महत्वपूर्ण बाबींवर चर्चा करून उपस्थित शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळेस शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीबाबत योग्य पद्धती याविषयी अधिक माहिती व प्रत्यक्ष प्रत्यक्षिक जाणून घेतली.
 
कार्यशाळेत दिंडोरीप्रणीत मार्गाच्या माध्यमातून उत्कृष्टपणे सेंद्रिय शेती करणाऱे व सेंद्रिय शेती करण्यासाठी इच्छुक असणार्‍या सर्व शेतकर्‍यांशी चर्चा करुन संवाद साधण्यात आला. या प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी जीवन देवरे यांनी नंदुरबार येथे दिंडोरी प्रणित मार्गाच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या १८ ग्रामविभागात राबविल्या जाणार्‍या विविध उपक्रमांचा लेखी अहवाल तसेच कृषी विभागाचा माध्यमातून चालणारे प्रशिक्षण व शेंद्रीय शेतीच्या माध्यमातून होणारे पीक,फळभाज्य, पालेभाज्यांची माहीती सादर केली. कोरोनाचे सर्व शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर ठेवून गायीच्या गौर्या,गायीचं तुप व वेखंड पावडरचा धूर शेतकर्‍यांना देऊन परिसरात सेंद्रिय सॅनिटाइज करुन या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.कृषी विभागाच्या आढावा बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, नंदुरबार येथील कृषी व आरोग्य विभागातील सेवेकरींनी सहकार्य केले.