औरंगाबादेत शेतकऱ्याच्या मृत्यूने हळहळ ! कर्जाचे पैसे देऊन येतो म्हणाला आणि बाप परतलाच नाही

    दिनांक : 28-Jan-2022
Total Views |
औरंगाबादः पोरांनो तुमच्या आईची काळजी घ्या, मी कर्ज घेतलेले पैसे जमा करून घरी येतोच , असं सांगून घरातून निघालेला बाप दोन दिवस झाले तरी आला नाही. तिसऱ्या दिवशी विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्याने शेतकरी कुटुंबावर आभाळच कोसळलं. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील ही घटना आहे. घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असतानाही कर्जाचे पैसे चुकवण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 

farmer 
 
 
कुटुंबावर कर्जाचा बोजा
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडितराव सीताराम कळंब असे मृताचे नाव आहे. ते भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी आहेत. कशी बशी गुजराण होईल, एवढी शेतीही मालकीची नसल्याने पंडितराव मजुरी करत असत. या मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी कर्जाचा बोजा वाढला होता. त्यामुळे मोलमजुरी करून उसने पैसे फेडणे सुरु होते. मागील वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी एका ठेकेदाराकडे ते कामाला होते.
 
घटनेचे सविस्तर वृत्त
 
विहिरीवर काम करण्यासाठी गेलेले पंडितराव घसरून विहिरीत पडले. त्यांना लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागला असल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या. परंतु बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. रात्री साडेनऊ वाजता वडोद तांगडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.