आपल्या कडून साध औरंगाबादचं संभाजीनगर झालं नाही ; फडणवीस, पुन्हा उठणार नामांतराचा मुद्दा?

    दिनांक : 24-Jan-2022
Total Views |
औरंगाबादः तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर करून दाखवलं नाहीत, अशी खोचक टीका भाजप नेते देवेंद्र फडणवीस  यांनी शिवसेना प्रमुख आणि मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणं हा सेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा आहे. दरवेळी निवडणुका आल्या की हा मुद्दा पक्षीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये उचलून धरला जातो. निवडणुका झाल्या की बारगळतो. हाच धागा पकडत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडलं. 25 वर्षे आम्ही भाजपसोबत युतीत सडलो, असं वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जोरदार टीका केली. शिवसेनेने बोलण्याव्यतिरिक्त करून काय दाखवलं? असा सवाल त्यांनी केला.

fadanvis 
 
 
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
 
सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तुम्ही साधं औरंगाबादचं संभाजीनगर केलं नाही. उस्मानाबादचं धाराशिव करू शकले नाहीत. तुमच्याच घोषणा होत्या ना? तिकडे भाजपने प्रयागराज करून दाखवलं. त्यांनी करून दाखवलं तुम्ही बोलत राहिलात. हिंदुत्व जगावं लागतं, भाषणापुरतं मर्यादित नव्हतं. मोदींनी ते करुन दाखवलं, ही आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली.
.काय आहे औरंगाबादचा नामांतर वाद?
 
– 1988 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी म्हणजे 33 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या विजयी सभेत शहराचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्याच सभेत त्यांनी औरंगाबादचं नामांतर करून शहराचं नाव संभाजीनगर करणार, अशी घोषणा केली. तेव्हापासून शिवसेनेसमोर हा नामांतराचा अजेंडा आहे. दरवेळी निवडणूक आली की शिवसेनेच्या वतीने हा मुद्दा उलचून धरला जातो.
 
– 2010 च्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा आणला गेला. पालिकेत युतीची सत्ता होती. नामांतराचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला गेला, मात्र राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारकडून तो फेटाळण्यात आला.
 
– 2015 मधील निवडणुकांमध्येही राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. तेव्हाही निवडणुकीच्या प्रचारात नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही.
 
– दरम्यान, आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वी 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबाद शहराचे संभीजीनगर नामांतर करावे, असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. हा ठराव पुन्हा एकदा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.