स्वखर्चाने शेतकर्‍यांनी बनविला शेतरस्ता

    दिनांक : 06-Sep-2020
Total Views |

jamthi_1  H x W
कौतुकास्पद : चाळीसगाव तालुक्यातील
जामठी येथील बळीराजाचा संघटीत संघर्ष
जामडी ता.चाळीसगाव, ६ सप्टेंबर
तालुक्यातील जामडी येथील शेतकर्‍यांनी शासकीय व प्रशासकीय मदत व निधीची वाट न पाहता स्वखर्चातून शेतरस्ता बनविला. शेतातून तयार माल वाहून आणतांना त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी संघटीत होऊन स्वखर्चाने रस्ताच तयार करण्याचा निर्णय घेतला.
 
 
सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. शेतकर्‍यांना नदी-नाले ओलांडून तयार झालेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रकने भरलेला ट्रॅक्टर अशाच पद्धतीने नदीच्या पाण्यात पलटी होऊन संपुर्ण कष्टाने कमावलेल्या आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध झाला. चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत, भगवान परदेशी, अरुण जाधव, अनिल जाधव, राजू परदेशी, सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये. आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किमी अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला. त्यामुळे राज्य शासनाकडून शेतरस्ता बनविण्यासाठीची उदासिनता यानिमित्ताने समोर आली आहे.
 
 
आता या शेतकर्‍यांना आपला शेतातील माल केळी टमाटा अद्रक इतर जो काय असेल तो सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय मदतीची किंवा निधीची अजिबात वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे सदर शेतकर्‍यांचे गावात व परिसरात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे .स्वतःच्या मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकर्‍याला आपली मेहनत पाण्यात जाणार नाही याचे समाधान होईल तसेच वेळेची पण बचत होणार आहे.
 
बर्‍याच वेळा शेतकर्‍याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात. सोपस्कार पार पाडले जातात. मात्र मदत निधी हवा तसा वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता तयार केला असे जामडी येथील आदर्श शेतकरी दीपकसिंग राजपूत यांनी सांगितले.