जळगाव, ९ ऑगस्ट
शेतकर्यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना या योजनेंतर्गत लाभ मिळणार असून या योजनेंतर्गत जळगाव जनता सहकारी बँकेच्या २११० खातेदारांच्या खात्यात ४२.२० लाखांची रक्कम जमा करण्यात आल्याचे जळगाव जनता सहकारी बँकेने कळविले आहे.
जळगाव जनता सहकारी बँक नेहमीच आपल्या खातेदारांना तत्पर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यास कटिबद्ध असते. बँकेमार्फत तत्परतेने जमा करण्यात आलेल्या या रकमेचा लाभ बँकेच्या खातेदारांना घेता येणार आहे.
तसेच या आणि अशा सर्व शेतकरी बंधूंना आपले शेतीतील उत्पन्न बाजारपेठेत नेण्यासाठी आवश्यक ते सर्व वित्त सहाय्य जनता बँक करणार असल्याचा संकल्पही बँकेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.