चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प

    दिनांक : 09-Aug-2020
Total Views |
भारतासाठी डोकेदुखी ठरणार
 
 
नवी दिल्ली : काही दिवसांपासून पाकिस्तान आणि चीन भारताविरोधात कुरघोडी करत आहेत. आता हे दोन्ही देश मिळून आर्थिक विकासासाठी हजारो कोटींचा रेल्वे प्रकल्प सुरू करत आहेत, मात्र त्यांच्या या रेल्वे प्रकल्पाचा मार्ग भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे, कारण ज्या जमिनीबद्दल भारत, चीन व पाकिस्तान यांच्यात वाद आहेत, त्याच भागातून हा प्रकल्प जात आहे.
 

railway-project_1 &n 
 
 
चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे 6.8 अब्ज डॉलर्स अर्थात 50,980 कोटी रुपयांचा रेल्वे प्रकल्प सुरू करीत आहेत, असे साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. याशिवाय बीजिंग व इस्लामाबाद यांनी मिळून थाकोट ते हवेलियांपर्यंत 118 किमी लांबीचा रस्ता तयार केला आहे. हा मुख्य रस्ता प्रकल्पाचा एक छोटासा भाग आहे. हा रस्ता पाकिस्तानमधील इस्लामाबाद ते चीनच्या झिनजियांग भागातील काश्गरपर्यंत जाणारा आहे. हा नवीन रस्ता जम्मू-काश्मीरला लागून असलेल्या वादग्रस्त भागातून सुरू होईल. हा रस्ता पूर्ण झाल्यावर चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना जम्मू-काश्मीरच्या बर्‍याच भागावर थेट नजर ठेवता येणे शक्य होणार आहे.
 
 
 
इस्लामाबाद ते काश्गरकडे जाणार्‍या या महामार्गाचे नाव ‘फ्रेंडशिप हाय-वे’ आहे. या महामार्गामुळे पाकिस्तान व चीन हे दोन्ही देश केवळ भारतातील अनेक सामरिक भागांवर केवळ नजरच ठेवू शकणार नाहीत, तर परस्पर वाहतुकीचा मार्गही खुला करू शकतील.
 
 
 
पाकिस्तान व चीनच्या या वाहतूक प्रकल्पांमुळे भारतात काही प्रमाणात अस्वस्थता आहे. कारण या महामार्गावरील भारतातील व्यूहरचनात्मक क्षेत्रांना सहजपणे धक्का बसू शकतो, असे शांघाय म्युनिसिपल सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे तज्ज्ञ वांग देहुआ यांनी म्हटले आहे.
 
 
 
पूर्वीचे काश्मीर हा तिन्ही देशांमधील प्रश्न नव्हता. पूर्वी हा मुद्दा केवळ भारत व पाकिस्तानचा होता. परंतु, आता भारत, पाकिस्तान व चीन यांच्यात हा मोठा मुद्दा बनला आहे. लडाखवर चीनच्या दाव्यानंतर भारताने कडक पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले.
 
 
भारताचे चीनशीही संबंध तणावपूर्ण आहेत. गत वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताने जम्मू-काश्मीरचे दोन भागात विभाजन केले होते. उत्तर भाग लडाख राज्य बनला आणि दक्षिणेकडील भाग जम्मू-काश्मीर तयार करण्यात आला. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तान व चीन या दोघांनाही धक्का बसला. कारण दोघेही या दोन राज्यांच्या भागांवर आपला दावा सांगत असतात. या आठवड्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या देशाचा नवीन नकाशा जाहीर केला. ज्यात जम्मू-काश्मीरवर भारताने बेकायदेशीरपणे कब्जा केला असल्याचे दाखविण्यात आले. त्याचबरोबर भारत सरकारने पाकिस्तानचा हा नकाशा नाकारला आहे.