30 वर्षांनंतर संकल्प पूर्ण झाला
अयोध्या : आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आहे. सुमारे 30 वर्षांपूर्वी एक संकल्प केला होता, तो आज पूर्ण झाला, याचा आनंद आहे. आता येथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचे निर्माण करावे लागणार आहे. सर्वांना आपले मानणारा धर्म उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपले मनमंदिर उभे करायचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज बुधवारी केले.
आज अनेक लोक येथे येऊ इच्छित होते. मात्र, ते येऊ शकत नाहीत. लालकृष्ण अडवाणीदेखील हा सोहळा आपल्या निवासस्थानी पाहात आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती, त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे सरसंघचालक म्हणाले.
गेल्या 30 वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ आज मिळाले आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही. आज सर्वांच्या आनंदाचा क्षण आहे. देशातील सर्वांमध्ये प्रभू श्रीराम आहेत. राम मंदिराच्या उभारणीचे काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु, आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसे मंदिर बनेल, तशीच आपल्या मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभे राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभे राहायला पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.