नवी दिल्ली : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील कोरोना संक्रमितांच्या रुग्णवाढीने वेग धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून ५०-५५ हजारांनी वाढणारी रुग्णसंख्या आता ६० हजारांहून अधिक संख्येने वाढू लागली आहे. दररोज नवा उच्चांक गाठणारी रुग्णसंख्या आढळून येत असल्यामुळे देशात सध्या भयावह परिस्थिती उद्भवली आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. देशभरात आतापर्यंत १५ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ६४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आले आहे. तर देशात काल एका दिवसात तब्बल १००७ रुग्णांचा कोरोनामुळे बाली गेला आहे. आतापर्यंतची एका दिवसातील बळींची ही सर्वाधिक संख्या आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २२ लाख १५ हजार ०७५ वर पोहोचली आहे. त्यापैकी सध्या ६ लाख ३४ हजार ९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत ४४ हजार ३८६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने ट्विट करत देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत एकूण १५ लाख ३५ हजार ७४४ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे.
तसेच, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत एकूण २ कोटी ४५ लाख ८३ हजार ५५८ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर, ९ ऑगस्ट रोजी ४ लाख ७७ हजार ०२३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.