शहरातील माॅल्स व शाॅपिंग काॅम्प्लेक्समधील दुकाने 5 ऑगस्टपासून सुरू होणार

    दिनांक : 01-Aug-2020
Total Views |
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती
 

sd_1  H x W: 0
 
जळगाव : जिल्ह्यातील दुकानदारांची दुकाने सुरु करण्याची सातत्याने होत असलेली मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आली होती. यास शासनाने विशेष परवानगी दिली असून येत्या ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत शहरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकाने सुरु करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत मनपा महापौर भारती सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मनपा आयुक्त सतीष कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण उपस्थित होते.
 
 सिनेमागृह व रेस्टॉरंट राहणार बंदच
ना. पाटील म्हणाले की, ५ ऑगस्टपासून सुरु होणार्‍या दुकांनाबाबत सुक्ष्म नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी संघटनेची बैठक आयोजित करुन धोरण, नियमावली निश्चित करावी, गर्दीचा उद्रेक होणार नाही याची दक्षता दुकानदारानी तसेच ग्राहकांनी घ्यावी, राज्यशासनाचे यापूर्वीचे सर्व निर्बंध लागू राहतील, मास्क वापरणे, सॅनिटायाझर, शारीरिक आंतर इत्यादी बाबींचे स्वयंशिस्तीने पालन व्हावे. कोरोनाचा संसर्ग ज्या मार्केटमध्ये आढळेल तेथील दुकाने नियमाप्रमाणे सील करण्यात येतील. तसेच मॉल्समधील दुकाने सुरू केली तरी सिनेमागृह व रेस्टॉरंट मात्र बंदच राहतील असे त्यांनी यावेळी सांगितले.
 
 
११ हजार ७५० सेवानिवृत्ताना थकीत महागाई भत्ता अदा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील ११ हजार ७५० सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांचा दोन वर्षापासून थकीत असलेला महागाई भत्ता रक्कम रुपये ६१ कोटी ७४ लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती ना. पाटील यांनी यावेळी दिली. मका खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी पोर्टल बंद झाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी मका खरेदी करण्यासाठी नोंदणी केली आहे. अशा शेतकर्‍यांचा मका शासनाने खरेदी करावा अथवा त्यांना अनुदान द्यावे यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करुन असेही एका प्रश्नाच्या उतरात ना. पाटील यांनी सांगितले.
 
कोरोना ः रुग्ण बरा होण्याचा दर ७० टक्क्यापर्यंत
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर आता ७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. असे असले तरी नागरिकांनी स्वयंशिस्तीने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
 
सोमवारी व्यापारी संघटनांची बैठकीत ठरणार धोरण
मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधीची बैठक सोमवार, ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असल्याचे सांगून त्यात सर्व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन धोरण ठरविण्यात येईल. शासनाच्या नियमांची त्यांना माहिती देवून नंतर दुकाने सुरू करण्यात येतील.