चेकाळलेल्या चीनच्या चोरवाटा!

    दिनांक : 28-Jul-2020
Total Views |
 
 
आंतरराष्ट्रीय
 
 
- वसंत गणेश काणे
 
 
 
हे युग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, हे मोदी ठणकावून सांगत असताना, सीमावाद उकरून काढून आपल्या सीमा शेजारच्या देशात सरकवणे, प्राचीन इतिहासकाळातील दाखले पुढे करीत प्रदेशांवर, नव्हे, देशांवरच अधिकार सांगणे, समुद्रातील आणि उपसागरातील बेटांवर आपला अधिकार गाजवणे किंवा प्रसंगी कृत्रिम बेटेही तयार करणे आणि नवीन प्रदेश जिंकून सामील करून घेणे, असे चीनचे चार विस्तारवादी प्रकार, निदान दीड डझन देशांबाबत तरी नक्कीच सुरू आहेत.
 
 

Gilgit_1_1  H x  
 
 
फार विचार करण्याची गरज नाही, चीनच्या आजच्या नकाशातून फक्त तिबेट जरी बाजूला काढला, तर त्याचे क्षेत्रफळ किती कमी होते, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. दुसरे असे की, 1911 मध्ये किंग घराण्याचा अंत होताच, मंगोलियाने आपले स्वातंत्र्य घोषित करून, ही घोषणा 1921 साली प्रत्यक्षात आणली, ती रशियाच्या मदतीने. म्हणून चीन आजही मंगोलियावर आपला अधिकार सांगत असतो आणि रशियावर नाराज असतो. चीनमध्ये लाल क्रांती झाल्यानंतर तर मंगोलिया व रशियाचे संबंध जनस्तरावरही आणखी दृढ झाले आहेत. मे 2015 मध्ये याच मंगोलियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांनी हंबा लामा यांना गंदन मठात रोवण्यासाठी बोधी वृक्षाचे रोपटे भेट म्हणून सोबत आणले होते. यावेळी अटलबिहारी वाजपेयी इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रशिक्षण सेंटरची कोनशिलासुद्धा त्यांनी बसवली होती. मोदींची ही भेट आपल्यापेक्षाही मंगोलिया, रशिया आणि चीन यांच्याच लक्षात नक्की असणार. मंगोलियाला ही भेट आवडली, रशियाला चालली, पण चीनला मात्र खुपली. चीनने चेकाळावे अशा अनेक घटना या अगोदर व नंतरही घडल्या आहेत.
 
 
 
Gilgit_2_1  H x
 
चीनने उकरून काढलेले सीमावाद
भारत आणि चीन : 1962 मध्ये अक्साई चीन जिंकून चीनने 38,000 चौरस किमी. भूभाग बळकावला आहे. तसेच पाकने बळकावलेल्या भागातून चीनला बहाल केलेली शक्सगाम नदी व खोर्‍यासकटची लांब पट्टीही चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय अरुणाचलमधील 90,000 चौरस किमी. भागावर चीनने दावा ठोकला आहे. तिकडे उत्तराखंडची 545 किलोमीटर लांबीची सीमा चीनला (तिबेट) लागून आहे. या भागातील निरनिराळ्या ठिकाणी मिळून एकूण 2450 चौरस किमी. भूभाग चीनला हवा आहे.
 
 
 
 
चीन आणि नेपाळ
आजचा नेपाळ चीनच्या ताटाखालच्या मांजरासारखा दिसत/वागत असला, तरी चीनने नेपाळमध्ये घुसखोरी करून हडपलेली एकूण 64 हेक्टर जागा ढोलाखा, हुमला आदी सहा जिल्ह्यांत विखुरलेली आहे. नेपाळ-चीन सीमा 1415 किमी. लांब आहे. या सीमेवर ठिकठिकाणी पिलर्स लावलेले होते. यापैकी 98 पिलर्स उखडून फेकण्यात आले आहेत, तर इतर काही पिलर्स नेपाळच्या सीमेत आत सरकवण्यात आले आहेत. नेपाळी कॉंग्रेसने याबाबत नेपाळच्या संसदेत ठराव मांडून चीनने नेपाळची हडपलेली भूमी परत मिळविण्यास ओली सरकारला सांगितले, पण व्यर्थ!
 
 
 
मे 2020 मध्ये चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने, माऊंट एव्हरेस्ट चीनच्या हद्दीत आहे, नेपाळच्या नव्हे, असे घोषित केले. नेपाळमध्ये संतापाची लाट उसळताच मात्र हे ट्विट डीलिट करण्यात आले. चीन आणि नेपाळमध्ये 1788 ते 1792 या काळात युद्ध झाले होते. त्याचा हवाला देत 64 हेक्टर जागेवर चीन आपला अधिकार सांगतो आहे. नेपाळचे विद्यमान पंतप्रधान ओली हे स्वत: साम्यवादी असून, चीनमधील साम्यवादी शासनाशी असलेली त्यांची घट्‌ट जवळीक पाहता, या प्रश्नावर नेपाळ का मूग गिळून गप्प बसला आहे, हे स्पष्ट होते. हाच नेपाळ भारताशी कसा वागतोय ते पाहा. नेपाळने ‘अर्थेन दास्यता’ या उक्तीला अनुसरून धनको चीनच्या इशार्‍याप्रमाणे भारताशी भांडण उकरून काढले आहे.
 
 
 
चीन आणि भूतान
जुलै 2017 मध्ये भूतानने चीनला बजावले होते की, दोन देशांदरम्यान झालेल्या सहमतीला अनुसरून वागावे. पण छे! डोकलाम प्रकरणानंतरही चीन भूतानमध्ये ठिकठिकाणी घुसखोरी करीत असतो. भूतानी गुराख्यांना भूतानी प्रदेशातूनच चिनी गस्ती तुकड्यांनी अनेकदा हुसकावून लावले आहे. चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर दावा करून भारतालाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
चीन आणि रशिया
चीनने रशियामधील 1 लक्ष 60 हजार चौरस किमी. जागेवर दावा ठोकला आहे. या संभाव्य घुसखोरीमुळे रशियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रशियाचा पूर्व किनारा विरळ लोकवस्ती असलेला, पण खनिजविपुल आहे. येथील बंदर आहे, व्लादिवोस्तॉक. 1860 मध्ये हा एका तहान्वये रशियाचा भाग झाला. चीनला आज तो परत हवा आहे. पण, रशिया संतापताच चीनने भूमिका बदलली आणि आमचा उद्देश फक्त ऐतिहासिक सत्यघटना सांगण्याचा होता, अशी मखलाशी केली. एका कायदेशीर तहान्वये रशियात सामील झालेले व्लादिवोस्तॉक , हे आज रशियाचे प्रचंड मोठे बंदर असून त्यामुळे रशियाला पॅसिफिक महासागरात (जपानी समुद्र) प्रवेश करता येतो.
 
 
 
उकरून काढलेले अन्य सीमावाद
दक्षिण चीन उपसागर आणि प्रशांत महासागरात चीनने जवळपास सर्व देशांशी सीमावाद उकरून वातावरण तापवले आहे. चीनचे तायवान, ब्रुनोई, इंडोनेशिया, मलायाशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि जपानबरोबर सागरविषयक प्रश्नी वाद आणि संघर्ष आहेत. समुद्रातील साधनसंपत्तीबाबत, जुनेपुराणे ऐतिहासिक दाखले दाखवत, चीन अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच, दक्षिण चिनी समुद्र आणि त्यातील लहानमोठी बेटे, समुद्रात जेमतेम बुडालेली बेटे, किनारे, यावर चीन आपला अधिकार गाजवत असतो.
 
 
 
मालकी हक्कासाठी कोणतेही निमित्त पुरेसे
व्हिएतनाम, जपान, तायवान, फिलिपिन्स, सिंगापूर , दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, ताजिकिस्तान, कंबोडिया यांसारख्या देशांवर ते चिनी उपसागराला किंवा प्रशांत महासागराला लागून असल्यामुळे, किंवा तिबेटप्रमाणे इतिहासकाळात ज्यांच्यावर कधीतरी चीनचे अंशत: किंवा पूर्णत: स्वामित्व असल्यामुळे किंवा काही सागरातील बेटे असल्यामुळे, ती जणू आपल्या तीर्थरूपांच्याच मालकीची आहेत, असा आव आणून चीन त्यांच्यावर आपला अधिकार सांगतो आहे.
 
 
 
जिंकून गिळंकृत केलेले प्रदेश
याशिवाय उरल पर्वत व सैबेरिया दरम्यानचा 16 लाख चौरस किमी. भाग, इनर मंगोलियाचा 12 लाख चौरस किमी. भाग, तायवानचा 36 हजार चौरस किमी. हिस्सा, हॉंगकॉंगचा अकराशे चौरस किमी. व मकावचा 33 चौरस किमी. भाग चीनने जिंकून आपल्या देशाला जोडला आहे, ते वेगळेच. देशांच्या सीमा मानवनिर्मित असतात, परमेश्वरनिर्मित नसतात, हे ऐतिहासिक सत्य आहे. हे खरे असले तरी आजच्या चीनच्या व त्याने दावा केलेल्या भूभागांना गृहीत धरून जर उद्या सीमा खरेच निश्चित झाल्या, तर त्या मानवनिर्मित नव्हे तर दानवनिर्मित असतील, असे म्हटले तर ते चुकेल का?