शेतकर्‍यांना युरिया उपलब्ध करून देण्यासाठी आ. मंगेश चव्हाण यांची भर पावसात कृषी केंद्रावर धाव

    दिनांक : 22-Jul-2020
Total Views |
 
 
चाळीसगाव : खरीप हंगाम अर्धा संपत आला तरी तालुक्यातील शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते विशेषतः युरिया उपलब्ध न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असताना तालुक्यातील निवडक कृषी केंद्रांवर बुधवारी युरिया उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकर्‍यांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. काही कृषी केंद्रांवर युरिया पोहोचला नसल्याने बंद होती. घाट रोडवरील सुयोग कृषी केंद्रावरदेखील मोठी गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. त्यातच अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकरी भर पावसात उभे असल्याची माहिती आ.मंगेश चव्हाण यांना मिळताच त्यांनी सुयोग कृषी केंद्र गाठत शेतकर्‍यांना धीर दिला.
 
 
CHL_Mangesh_Chavhan_1&nbs
 
आ.मंगेश चव्हाण यांनी कृषी केंद्र संचालक यांना बोलावत दुकान उघडण्याच्या सूचना दिल्या व शेतकर्‍यांच्या पावत्या तयार करून त्यांना युरिया देण्याच्या सूचना दिल्या. स्वतः आमदार आपल्यासाठी भर पावसात धावून आल्याचे पाहून शेतकर्‍यांना देखील धीर आला.
 
यावेळी आ.मंगेश चव्हाण म्हणाले की, कोरोनापासून बचावासाठी सरकार सोशल डिस्टनसिंग पाळा असे सांगत असताना मात्र युरियाच्या २ गोण्यांसाठी भर पावसात जीव मुठीत घेऊन उभे राहावे लागत आहे. मी पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असून राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, येत्या काळात शेतकर्‍यांना पुरेशा प्रमाणात खते व युरिया उपलब्ध न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आ.चव्हाण यांनी दिला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, चेतन पाटील उपस्थित होते.
 
 
आमदारांनी स्वतः बनवल्या पावत्या
भर पावसात शेतकरी बांधवांची व्यथा पाहून आ.चव्हाण यांनी पुढाकार घेत स्वतः सुयोग कृषी केंद्राच्या काउंटरवर बसून युरिया बिलाच्या पावत्या बनवायला सुरुवात केली. आमदारांनी घेतलेला पुढाकार पाहून कृषी केंद्राच्या संचालकांनी अतिरिक्त यंत्रणा लावत रांगेत असणार्‍या शेतकर्‍यांना बिले दिली.
 
 
शेतकर्‍यांच्या संतप्त प्रतिक्रिया
सकाळी ८ वाजेपासून रांगेत भर उन्हात आणि नंतर भर पावसात उभे आहोत, पोटात अन्नाचा कण नाही. प्यायला पाणी नाही. आमची अवस्था पाहून येणारे जाणारे हसत असताना शेतकर्‍यांचे कैवारी बनणार्‍या व पावसात भिजणार्‍या राज्यकर्त्यांनी जरा आमच्या व्यथा जाणाव्यात अशा भावनिक व संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. यावेळी महिला, वृद्ध व अपंग शेतकरी युरिया घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले.
 
 
आ.चव्हाण यांच्या सूचनेवरून स्थानिक भाजपा पदाधिकारी सचिन दायमा, सम्राट सोनवणे, राजेंद्र कवडे यांनी यांनी चहा व बिस्किटे वाटप केली.