फैजपूर, ता.यावल : राज्यात सध्या कोरोना संसर्गाचा भडका उडालेला असतानाच जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांचा उच्चांक गाठलेला असल्यामुळे अद्यापही शाळा, महाविद्यालय व सामूहिक गर्दीची वर्दळ असलेल्या जागी बंदी घातली आहे मात्र यावलच्या आदिवासी विकास विभाग अनुदानित आश्रमशाळा प्रकल्पातील कर्मचारी व शिक्षक यांना केलेल्या सक्तीच्या उपस्थितीमुळे कोरोना संक्रमित होण्याचा धोका असल्याची भीती येथील शिक्षक व कर्मचारी वर्गात व्यक्त होत आहे. याबाबत प्रकल्प अधिकार्यांनी वेळीच गंभीर दखल घ्यावी, असे बोलले जात आहे.
असे असतानाही १२ जून २०२० च्या पत्रकानुसार शाळा पूर्व तयारीसाठी सर्व आश्रमशाळांमध्ये आजतागायत १०० टक्के कर्मचारी १५ जून २०२० पासून पूर्णवेळ उपस्थित आहे. १९ जूनच्या पत्रकानुसार शाळा पूर्वतयारीची सुरूवात केली गेली. त्यानंतर २९ जूनच्या पत्रकानुसार १९ जूनच्या पत्रकाला स्थगिती देण्यात आली असून कर्मचारी मात्र आजही भितीयुक्त वातावरणात १०० टक्के पूर्णवेळ जीव मुठीत ठरून उपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे.
शालेय शिक्षण विभाग, मुख्यमंत्री, आदिवासी विकासमंत्री तसेच जिल्हाधिकार्यांचे शाळांमध्ये शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना व निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या २४ जून २०२० च्या मार्गदर्शक सुचनांनुसार शाळांमध्ये १०० टक्के व पूर्णवेळ कर्मचारी उपस्थित न ठेवता मार्गदर्शक सुचनेनुसार उपस्थिती व इतरांना वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मात्र फक्त आदिवासी विकास विभागाच्या कर्मचार्यांवरच अन्याय केला जात आहे, अशी भावना कर्मचार्यांमध्ये वाढतांना दिसत आहे.
सदर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व परिपत्रकानुसार शाळेत विद्यार्थी उपस्थित नाही व १९ जूनच्या पत्रकानुसार कामांना स्थगिती आहे. मात्र १० टक्के पूर्णवेळ कर्मचारी उपस्थितीचा अट्टाहास कशासाठी? हा मोठा प्रश्न आहे. या अट्टटाहासापोटी आपण आपल्याच कर्मचार्यांच्या जीवाशी का खेळत आहात? कर्मचारी हे वेगवेगळया ठिकाणांहून एकत्र येत असल्याने कोरोना संकमण झाल्यास त्या कर्मचार्यांपासून त्यांच्या परिवारास व समाजात संकमण झाल्यास यास कोण जबाबदार आहे?
aकठीण परिस्थितीतही कर्मचारी काम करायला तयार आहेत मात्र विनाकारण त्यातच इतर विभाग त्यांच्या कर्मचार्यांची काळजी घेताना दिसत आहे. विभाग कर्मचार्यांच्या जीवावर का उठलेला आहे? गरजेचे वाटल्यास कर्मचार्यांना उपस्थित करता येऊ शकते मग फक्त त्रास व जीवनाशी खेळ करणे यासाठी हट्ट का आहे? कारण चोपडा तालुक्यातील २ आश्रमशाळांतील २ कर्मचारी बाधित झालेले आहेत. त्यामुळे सर्व कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
तरी शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सुचना तसेच इतर पत्रकांप्रमाणे कर्मचारी व त्यांच्या परिवाराबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून कर्मचारी १०० टक्के उपस्थितीचा हट्ट सोडून काही प्रमाणात उपस्थिती व इतरांना वर्क फ्रॉम होम अशा पद्धतीने नियोजन करून उपकृत करावे अथवा विभागामार्फत कर्मचार्यांना इतर कोरोना योध्यांप्रमाणे कोरोना संकटाशी सामना करण्यासाठीचे सुरक्षा व्यवस्था साहित्य व विमा कवचची व्यवस्था त्वरित करून देण्यात यावी. याबाबत आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संबंधित अधिकारी वर्गास काही दिवसांपूर्वी लेखी निवेदन दिले असल्याचे कळते मात्र याकडे अद्यापही हा वरिष्ठ अधिकारी वर्ग दूर्लक्ष करीत आहेत. या बाबी जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष घालून आश्रमशाळा कर्मचारी व शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.