जामनेर : तालुक्यातील मोयखेडा दिगर येथील १२ वर्षीय आनंद श्याम चौधरी हा गावातील गुळ नदीत खेखडे शोधण्यासाठी गेला असता नदीत रेतीच्या उपस्यामुळे पडलेल्या खड्यात साचलेल्या डोहात पाय घसरून पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मोयखेडा दिगर गावात या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आनंद याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्याला तीन बहिणी, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. जामनेर तालुक्यात अवैध वाळू उपस्याने हा बळी घेतला असून या भागातील महसुली कर्मचारी व अवैध वाळू उचल करणारे यांचे आर्थिक लांगेबांधे असल्याने नदीत असे खड्डे पडून त्यात पाणी साचून डोह तयार होत आहे. त्यामुळेच या मुलाला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे गावातील नागरिक यांनी महसूल प्रशासनावर संताप व्यक्त केला.