जळगाव : जैन इरिगेशनतर्फे सुरू असलेल्या ‘स्नेहाची शिदोरी’ हा उपक्रम लॉकडाऊनच्या काळात गरजूंचा आधार ठरला आहे. 6 जुलै पर्यंत उपक्रमांतर्गत 6 लाख 7 हजार लोकांना भोजनाची पाकिटे पोहचविण्यात आली. 31 मे नंतर अनेक अन्नछत्र बंद झाले असतानाही शहरातील गरजूंसाठी हा उपक्रम सुरूच आहे. जळगाव शहरात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याने गरजूंची संख्या पाहता रोज सकाळी 2400 व संध्याकाळी 600 भोजनाची पाकिटे जैन इरिगेशनतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नविन बसस्थानकाजवळील कांताई सभागृह येथे सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान भोजनाची पाकिटे उपलब्ध करून दिली आहेत. गरजूंनी प्रत्यक्ष येऊन भोजनाची पाकिटे घ्यावीत. भोजनाची पाकिटे वितरणात अरविंद देशपांडे, किशोरसिंग, शालीग्राम राणे, समीर शेख आदी सहकार्य करीत आहेत.
देशात दि. 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. सर्वच क्षेत्रात टाळेबंदी व कामबंदची स्थिती उद्भवली. याचा परिणाम विविध घटकांतील लोकांच्या दोन वेळच्या भोजनाची भ्रांत निर्माण झाली. या कठिण काळात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. ने स्वतःचे कर्तव्य समजून विविध प्रकारच्या सामाजिक भूमिका व जबाबदारी निभावल्या. जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 एप्रिलपासून शहरातील गरजवंतांसाठी दोन वेळच्या भोजन पाकिटांची उपलब्धता करुन देण्याची सेवा सुरू केली. 6 जुलै पर्यंत अखेरच्या जवळपास 6 लाख 7 हजार लोकांपर्यंत भोजन पाकिटे नित्यनियमाने पोहचवली.