सुरक्षित अंतर आणि मास्कशिवाय पर्याय नाही : पंतप्रधान मोदी

    दिनांक : 27-Jun-2020
Total Views |


 
हे संकट कल्पनातीत : पंतप्रधान
 

नवी दिल्ली : जगावर कोरोनासारख्या भयंकर संकटाचा सामना करावा लागेल, याची कल्पना कधी कुणी केली नव्हती. या महामारीवर औषध सापडत नाही, तोपर्यंत सुरक्षित भौतिक अंतर आणि तोंडाला मास्क हाच एकमेव सुरक्षित पर्याय आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी केले. आत्मनिर्भर उत्तरप्रदेश रोजगार अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

 
 

PM Modi_1  H x  
 
 

देशावर इतके मोठे संकट आले असताना, उत्तरप्रदेशने साहस आणि समजूतदारपणा दाखवून कोरोनाला नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले. ही गोष्ट अभूतपूर्व आणि प्रशंसनीय असल्याचे मोदी यांनी सांगितले.

 
 

आपण सर्वांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले असतील. आपण अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला असेल. मात्र, संपूर्ण जगावरच एवढे मोठे संकट येईल, याची कल्पना कधी केली नव्हती. हे असे संकट आहे, जिथे लोक इच्छा असूनही एकमेकांची मदत करू शकत नाहीत. तूर्तास यावर एकच औषध आहे आणि ते म्हणजे एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क परिधान करणे चेहरा झाकणे. कोरोनावर लस सापडत नाही, तोपर्यंत याच सुरक्षित उपायांचा आपल्याला अवलंब करावा लागणार आहे, असे मोदी म्हणाले.

 
 

उत्तरप्रदेश सरकारने कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, त्यामुळे सुमारे 85 हजार लोकांचे प्राण वाचविणे शक्य झाले आहे. योगी आदित्यनाथ सरकारचे योग्य व्यवस्थापन कौतुकास्पद आहे, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

 

 
सव्वा कोटी लोकांना मिळणार रोजगार : योगी

आत्मनिर्भर उत्तरप्रदेश अभियानांतर्गत राज्यातील सुमारे सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. हे अभियान महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कोरोनाचे संकट भीषण असले, तरी त्यातून संधी शोधायलाच हवी. आपण ती शोधत आहोत आणि तिचे सोनेही करीत आहोत, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.