भारतीय लष्कराला मोठे यश
नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील वाढलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर काल भारत आणि चीनमध्ये लेफ्टनंट जनरल स्तरावर सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सैन्य माघारी घेण्यावर एकमत झाले. पूर्व लडाखमध्ये वादग्रस्त जागांवरून सैन्य मागे घेण्याबद्दल चर्चा झाली असून दोन्ही बाजू याची अंमलबजावणी करतील, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
भारत आणि चिनी सैन्यात काल लेफ्टनंट जनरल स्तरावरील बैठक झाली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे चीनच्या हद्दीत येणाऱ्या मोल्डो भागात ही बैठक पार पडली. तब्बल १२ तास चाललेल्या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यास चीन तयार आहे. त्यामुळे भारतही आपले जवान मागे घेईल, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
पूर्व लडाखमध्ये ५ मेपासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. हा तणाव निवळण्यासाठी ६ जूनला कमांडर दर्जावरील अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. त्यातही सीमेवरून सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. चीनने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे का त्याची पाहणी करण्यासाठी भारतीय सैन्य १५ जूनला गलवान भागात गेले होते. मात्र, पोस्ट हटवण्याचे आवाहन करणाऱ्या भारतीय जवानांवर चिनी सैन्याने हल्ला केला. भारतीय जवानांनीही चीनला चोख प्रत्युत्तर दिले.