प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आवश्यकता पडली तर शस्त्र चालवण्याची मोकळीक भारताने आपल्या लष्कराला दिल्यानंतर, चीनचा जळफळाट होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच असे काही केले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनने ग्लोबल टाइम्स या आपल्या मुखपत्रातून दिला आहे. लडाखमधील गलवान खोर्यातील भारत आणि चीन यांच्यातील झटापटीच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्कराला गोळी चालवण्याच्या दिलेल्या पूर्ण स्वातंत्र्यामुळे चीनची पाचावर धारण बसल्याचे या धमकीतून दिसते आहे. हातात शस्त्र नसताना भारतीय जवानांनी दिलेल्या दमदार प्रत्युत्तरात चीनचे भारतापेक्षा दुप्पट जवान मारले गेले आहेत. त्यामुळे हातातील शस्त्रांचा वापर भारतीय जवानांनी केला, तर चीनचे काय हाल होतील, याची कल्पना करवत नाही.
1962 च्या भारतात आणि 2020 च्या भारतात जमीन-अस्मानचा फरक आहे. तेव्हाचा भारत हा नेहरूंचा भारत होता, तर आजचा भारत नरेंद्र मोदी यांचा आहे, हे चीनने विसरू नये. पंडित नेहरूंनी चीनवर आंधळा विश्वास ठेवत ‘हिंदी चिनी भाई भाई’ असा नारा भाबडेपणाने दिला होता. पण, आपण कधीच कुणाचे भाऊ होऊ शकत नाही, हे चीनने 1962 मध्ये दाखवून दिले. जो चीन आपल्या देशातील तरुणांचा कधी झाला नाही, तो आपला कसा होणार? तियानमेन चौकात लोकशाहीमार्गाने आंदोलन करणार्या तरुणांवर रणगाडे घालणार्या आणि हजारो तरुणांची हत्या करणार्या चीनच्या निर्दयी राज्यकर्त्यांपासून यापेक्षा वेगळी अपेक्षा कशी करता येणार? भारतासोबत विश्वासघात करण्याची चीनची जुनी सवय आहे. 1962 पासूनची ही सवय 58 वर्षांनंतरही कायम आहे, नव्हे, वाढली आहे. चीनने विश्वासघात केल्यानंतर, तेव्हा पंतप्रधान असलेले पंडित जवाहरलाल नेहरू हतबल झाले होते. पण, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी चीनला तेवढेच दमदार प्रत्युत्तर दिले आहे. चीनला कदाचित अशा प्रत्युत्तराचीच अपेक्षा नसावी.
एखाद्याला आपला मित्र मानला तर त्याचे स्वागत कसे करायचे, हे नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. मित्र मानल्यावर झोपाळ्यावर बसवायला ते मागेपुढे पाहात नाहीत. मात्र, मित्राने विश्वासघात केला तर त्याला झोपाळ्यातून जमिनीवर आदळायला मोदींना वेळ लागत नाही, याचा अनुभव चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिंपग यांनी घेतला आहे. मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर मित्राने विश्वासघात केला, तर हात पिरगाळायची ताकद आताच्या सरकारमध्ये आहे, हे चीनने विसरू नये.
भारत आणि चीनमध्ये 1996 आणि 2005 मध्ये झालेल्या कराराचा आदर करत भारतीय लष्कराने आपल्याजवळची शस्त्रं चालवली नाहीत, त्यामुळे भारताच्या जवानांना शहीद व्हावे लागले. नियंत्रण रेषेवर जाताना दोन्ही बाजूच्या जवानांनी आपल्या जवळ शस्त्र ठेवू नये, असे या करारात म्हटले होते. या करारामुळेच भारतीय लष्कराचे हात बांधले गेले होते. संरक्षणमंत्री राजनाथिंसह यांनी तिन्ही सेनादलांची उच्चस्तरीय बैठक घेत, या करारातून भारतीय लष्कराला मोकळे केले आहे. याचा अर्थ, लष्कराने कारण नसताना शस्त्राचा वापर करावा, असे नाही. स्वत:हून शस्त्र चालवायचे नाही, पण समोरच्याने शस्त्र चालवायची वेळ आणली तर आता माघार घ्यायची नाही, हातातील शस्त्रानिशी त्वेषाने समोरच्या शत्रूवर तुटून पडायचे, अशी भारताची भूूमिका आहे. प्रत्येक देशाला आपल्या भूमीचे रक्षण करण्याचा, त्यासाठी शस्त्र चालवण्याचा अधिकार आहे, हेच भारताने आपल्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. या भूमिकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथिंसह यांचे अभिनंदन केले पाहिजे.
चीन हा देश आणि त्याचे राज्यकर्ते हे नेहमीच वर्चस्ववादी भूमिकेचे राहिले आहेत. आपल्या पाशवी बळाच्या आधारे जगावर राज्य करण्याची त्यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. काही देशांनी चीनसमोर शरणागती पत्करली असली, तरी भारत हा कधीच आपल्यासमोर शरणागती पत्करणार नाही, हे चीनने लक्षात ठेवले पाहिजे. चीनशी लढायची ताकद भारताची आणि भारतीय लष्कराची आहे. भारताचे लष्कर चीनच्या लष्करापेक्षा श्रेष्ठ आहे. कदाचित शस्त्रास्त्रसंख्येच्या दृष्टीने चीनचे लष्कर मोठे असेल, पण भारताचे लष्कर शिस्तबद्ध, पूर्णपणे प्रोफेशनल तसेच राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले आहे.
चीनने आपल्या पाशवी आर्थिक ताकदीच्या बळावर नेपाळसारख्या छोट्या देशाला आपले अंकित करून घेतले आहे. त्यामुळे आज नेपाळ आपली ताकद नसतानाही भारताला डोळे दाखवत आहेत. मुळात, आपला खरा मित्र कोण आणि मित्राच्या आविभार्वात असलेले शत्रू कोण, हे ओळखण्यात नेपाळ कमी पडला आहे. त्यामुळे भारताचा भूप्रदेश आपल्या नकाशात समाविष्ट करण्याची चूक नेपाळने केली आहे. नेपाळला ही चूक महागात पडणारी आहे. नेपाळ हे िंहदुराष्ट्र असल्यामुळे भारताला त्याच्याबद्दल आस्था वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे भारत हा नेहमीच नेपाळचा नैसर्गिक मित्र राहिला आहे. जेव्हा जेव्हा नेपाळ अडचणीत आला, तेव्हा तेव्हा कोणत्याही स्वार्थाशिवाय भारत त्याच्या मदतीला धावून गेला. चीनने नेपाळशी केलेली मैत्री काही स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून केलेली आहे. भारताची मैत्री ही नि:स्वार्थ भावनेची होती. चीनने नेपाळला आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे गुलाम केले आहे. नेपाळचे डोळे लवकर उघडले नाहीत, तर चीनने आपल्याला कधी पूर्णपणे गिळंकृत केले, हे नेपाळला समजणारपण नाही!
जपान, तायवान, फिलिपाइन्स, ब्रुनेई आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांशीपण चीनची वागणूक अशीच राहिली आहे. चीनबाबतची नाराजी रशियालाही लपवता आली नाही, त्यामुळे भारत-चीन संघर्षात रशियाने भारताला साथ दिली तर आश्चर्य नाही. राजनाथिंसह तसेही सध्या रशियाच्या दौर्यावर आहेत, हा निव्वळ योगायोग समजायचे कारण नाही. चीनला आपल्या लष्करी आणि आर्थिक शक्तीचा गर्व झाला आहे. त्यामुळे जगातील कोणताही देश आपल्या डोळ्याला डोळा भिडवू शकणार नाही, असे चीनला वाटते आहे. मात्र, त्याची गाठ भारताशी आहे आणि भारताचे नेतृत्व पंतप्रधान मोदींकडे आहे. म्हणजे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गाठ मोदी यांच्याशी आहे. मोदी यांच्यासमोर जिनपिंग यांची डाळ आधीही शिजली नाही, पुढेही कधी शिजणार नाही.
संपूर्ण जगाला कोरोनाची लागण ही चीनमधून झाली आहे. त्यातही कोरोनाचा व्हायरस हा चीनच्या प्रयोगशाळेतून निघाल्याचा संशय आहे. त्यामुळे जगातील बहुतांश देेशांचा चीनवर राग आहे. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई चीनला मागण्याची तयारीही अनेक देशांनी केली होती. चीन याला भीक घालेल का, हा वेगळा प्रश्न आहे. आपल्या पाशवी लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या बळावर नायक होण्याचे स्वप्न पाहणारा चीन आज जगाच्या दृष्टीने खलनायक झाला आहे. अशा परिस्थितीत चीनकडून अधिक जबाबदारीच्या वागणुकीची अपेक्षा होती. पण, चीनकडे शहाणपणाचा आणि मुत्सद्देगिरीचाही अभाव असल्याचे गलवान खोर्यातील घटनांनी दिसून आले आहे. भारताने चीनला बुद्ध दिला, तोच चीन आज भारतावर युद्ध लादण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच भारतानेही आपल्या तिन्ही सेनादलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे. भारताच्या लष्करी सज्जतेची चीनला कल्पना नाही, असे नाही. त्यामुळे चीन, पाकिस्तानच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करत आहे. आपण भारताशी युद्ध करू शकत नाही, तेवढी आपली ताकद नाही, याची जाणीव असल्यामुळे पाकिस्तान भारताशी युद्ध करण्याची हिंमत करत नाही, तर घातपाती कारवाया करत असतो. तशीच स्थिती चीनची होणार आहे. गलवान खोर्यात केल्या, तशा कारवाया चिनी लष्कर भविष्यातही करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी कदाचित सीमा बदललेली राहू शकते, पण चीनचा स्वभाव बदलणार नाही, कारण ‘लातों के भूत बातोंसे नाही मानते!’ अशी चीनची स्थिती झाली आहे. चीन एकीकडे भारतासोबत चर्चेचे नाटक करेल आणि दुसरीकडे आपल्या कुरापतीही थांबवणार नाही. पण, चीनने भारताच्या सहनशक्तीची परीक्षा घेऊ नये. पंतप्रधान मोदी यांच्या संयमाचा अंत पाहू नये. मोदी यांनी आपला तिसरा डोळा उघडला, तर स्वत:ला महाशक्ती समजणार्या चीनला पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही! चीनने ‘आ बैल मुझे मार’ करू नये, हाच या सार्या घटनांचा अन्वयार्थ आहे!